होळी
मराठी महिन्यातील शेवटचा महिना.
होळी, धुलीवंदन व रंगपंचमी या उत्सवांचा महिना तप्त उन्हाळ्याची जाणीव करून देतो.
फाल्गुन म्हणजे गुलाल, गुलाल म्हणजे ऐश्वर्याचे, प्रेमाचे आणि त्यागाचे प्रतीक.
फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला 'होळी', फाल्गुन वद्य प्रतिपदेला 'धुलीवंदन' व फाल्गुन वद्य पंचमीला 'रंगपंचमी' असे म्हणतात.
या सणाला महाराष्ट्रात 'शिमगा' व 'होळी' तर उत्तर प्रदेशात 'होरी' असे म्हणतात.
ओरिसात भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात घालून झोका देतात.
तीन दिवस चालणाऱ्या उत्सवाला ते 'दोलोत्सव' म्हणतात.
बंगालप्रांतात 'दोलायात्रा' तर दक्षिणेत 'कामदहन' या नावाने ओळखतात.
फाल्गुन पौर्णिमेला काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या:
१. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने बहीण 'होलिका' हिला आमंत्रित केले. 'मी तुला जाळणार नाही' असा अग्नीने होलिकेला वर दिला होता.
हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला होलिकेसह चितेवर बसवून ती पेटविली. वराचा दुरुपयोग केल्याने व होलिका भस्म झाली, पण प्रल्हाद सुरक्षित राहिल्याने लोकांना आनंद झाला. त्याची स्मृती म्हणून लोक होळी पेटवतात.
२. रघुच्या राज्यात 'ढुंढा' नावाची एक राक्षसीण होती. 'जर तू निष्पाप लोकांचा छळ केलास व ते तुला नींद्यवचने बोलली तर तुझी शक्ती क्षीण होईल' असे ब्रह्मदेवाने सांगितले.
ढुंढा राक्षसीण लहान मुलांना पळवून ठार मारत असे. तेव्हा लोकांनी तिला पळवून लावण्यासाठी होळी पेटविली व तिच्याभोवती दोन्ही हातांनी बोंब ठोकून अपशब्द वापरले.
ढुंढा राक्षसीण पळून गेली. त्या आनंदाप्रित्यर्थ पेटविलेल्या चितेत पाणी ओतून लोकांनी ती राख एकमेकांच्या अंगावर शिंपडून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी केली.
आपली मुले राक्षसिणीच्या क्रौर्यातून वाचली. म्हणून लोक दरवर्षी फाल्गुन शु.||१५|| ला आपल्या दारासमोर किंवा गावातील चौकात आंबा, माड, पोफळ,एरंड आदी लाकडांची व गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांची होळी करतात.
होळी पेटवून तिच्याभोवती पाण्याची धार धरून शंखध्वनी करून अपशब्द वापरतात.
कंसाज्ञेने आलेल्या पुतनेचे स्तनपान करून श्रीकृष्णाने तिचा वध केला. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता.
आपला लाडका कृष्ण सुखरूप राहील्याचा आनंद गोकुळातील लोकांनी होळी पेटवून व्यक्त केला.
त्रिपुरासुराचा मुलगा तारकासुर लोकांचा छळ करू लागला. भगवान श्रीशंकराला होणाऱ्या मुलाच्या हातून तुझा नाश होईल, असे ब्रह्मदेव तारकासुराला म्हणाले तेव्हा श्रीशंकर ध्यानमग्न अवस्थेत होते.त्यांचा ध्यानभंग होऊन पार्वतीला त्यांच्यापासून पुत्रप्राप्ती व्हावी, म्हणून देवांनी मदनाला पाठविले.मदनाने आपला मदनबाण शंकराच्या हृदयावर सोडल्यामुळे शंकराचा ध्यानभंग झाला.
आपला ध्यानभंग झाल्याने शंकर संतप्त झाले व त्यांनी आपल्या कपाळावरील तिसरा डोळा उघडून मदनाला जाळून टाकले.
तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता.
या दिवशी श्रीराम व सुग्रीवाची भेट झाली.
आगीपासून होणारी जीव व अर्थहानी टाळण्यासाठी या दिवशी आमचे पूर्वज अग्नीची प्रार्थना करत.
अशा अनेक घटनांची स्मृती म्हणून हा उत्सव संपूर्ण भारतात संपन्न करतात.
होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य होळीत टाकून नारळ अर्पण करतात व दूध टाकून विसर्जन करतात.
दुसऱ्या दिवशी होळीच्या रक्षेला वंदन करून ती कपाळावर लावतात, म्हणून या सणाला धूलीवंदन व धुळवड असे म्हणतात.
फाल्गुन वद्य पंचमीला श्रीकृष्णाने गोकुळातील स्त्री-पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता.
जीवन अनेक रंगांनी नटलेले असून ते आत्मविश्वासहीन नसावे.
ते सप्तरंगाने, संगीताने व परस्परांतील प्रेमसंबंधाने खुलले पाहिजे.
हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी संपन्न केली जाते.
या मासातील पौर्णिमा व अमावस्या या तिथी १४ मन्वादी म्हणजे मन्वंतराच्या प्रारंभ तिथींपैकी आहेत.
दक्षिण भारतातील बहुसंख्य उत्सव या महिन्यात आहेत.
या पौर्णिमेला 'अशोक पौर्णिमा' व्रत करतात. यात पृथ्वी, चंद्र व केशव यांची पूजा करतात.
तरुणांनी गाव स्वच्छ करून सर्व कचरा गोळा करावा व त्याची होळी करावी, परंतु लाकडांची होळी करू नये. म्हणजे वृक्षहानी न होता गाव प्रदूषण व रोगमुक्त होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा