पक्षपंधरवडा-
कधीतरी कोणीतरी मृत्यूवर खटला भरला आहे का? हे मृत्यो! तू आमच्या प्रिय व्यक्तीला घेऊन गेलास? असा साधा प्रश्न तरी त्याला कोणी विचारला आहे का? केवढा अजब आहे हा मृत्यू ! जो अप्रिय असूनही सर्वमान्य आहे.
ईश्वराचे अवतार असो वा साक्षात्कारी संत, राजा असो वा रंक, सज्जन असो वा दुर्जन पण त्याच्या तडाख्यातून कधीच कोणी सुटले नाही.
एका क्षणात सगळा खेळ संपून जातो. उरतात त्या फक्त आठवणी,रडणे,विरह, गुणवर्णन.
मृत्यू तसा सुंदरही आहे, कारण असाध्य रोगाने जर्जर झालेल्या माणसाला हा अपरिचित पाहुणा जवळ येऊन प्रेमाने सांगतो,'चल बाबा माझ्याबरोबर',या धरतीवर आता तुला सगळेच कंटाळले आहेत.
असा हा सर्वांचा गोड दोस्त आहे तरी कोण? याचा विचार करावयास भाग पाडणारा भाद्रपदातील पक्षपंधरवडा.
हा सण नाही, उत्सव नाही, तर आपल्याला सोडून गेलेल्या माणसाला तृप्त करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ.
त्यांच्यासारखेच आपल्यालाही हे जग सोडून जायचे आहे, याची जाणीव करून देणारा काळ.
पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे सत्य असून या विश्वात श्रीविष्णू-वैकुंठ, श्रीशिव-कैलास, ब्रम्हदेव -सत्यलोक,इंद्र-स्वर्ग व यम-यमलोकहे दिव्य लोक आहेत, असे म्हटले आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले- मी धर्मकार्य करण्यासाठी वैकुंठातून धरतीवर आलो आहे. 'आम्ही वैकुंठवासी| आलो याच कारणासी||
आपल्या कार्य समाप्तीनंतर ते सदेह वैकुंठाला गेले, असा इतिहास आहे.
पूर्वजन्म आणि पुनर्जन्म आहे सत्य वाटते, कारण काही लोकांचे वय व ज्ञान याचा कोठेच मेळ बसत नाही.
शंकराचार्य आठव्या वर्षी सर्वज्ञ होते.हस्तामलक हा जन्मताच वेडा वाटणारा मुलगा आद्य शंकराचार्यांना पाहताक्षणी सर्वज्ञ झाला. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी खूपच लहान वयात 'ज्ञानेश्वरी'सारखा असामान्य ग्रंथ लिहिला. अर्थरयंग ८ व्या वर्षी गणितज्ञ. कालबर्न आठव्या वर्षी गणिते सोडवत.इ.
सूर्य व संज्ञा यांना वैवस्वत मनु आणि यमी ( यमुना) एक कन्या झाली. सूर्यपुत्र यमाला त्याच्या कर्तृत्वाने भगवान शंकराने यमलोकांचे प्रमुखपद दिले. कारण शंकर हे मृत्यूची प्रथम देवता आहे. म्हणून मृत्यू टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्याची पद्धत आहे.
माणूस कधीही मृत होवो,तो ज्या तिथीला मृत झाला असेल त्या तिथीला भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत त्याच्या नावाने 'श्राद्ध'कर्म करावे, म्हणजे मृत आत्म्याला आनंद होतो, अशी श्रद्धा व प्रथा आहे.
मृत पितरांना मंत्राद्वारा आवाहन करून त्यांना प्रिय असलेले भोजन श्रद्धेने समंत्रक विधीपूर्वक अर्पण केले जाते, त्या कर्माला श्राद्ध म्हणतात.
श्रध्दया यत् क्रियेते तत् श्राद्ध:|'श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध.
पितरांना तृप्त करण्यासाठी केलेल्या विधीला तर्पण म्हणतात.
पितृपक्ष वा श्राद्धपक्ष, महालयपक्ष व पितृपंधरवडा इत्यादी नावाने हा काळ ओळखला जातो.
सुरुवातीच्या काळात अग्नीमध्ये समिधा व पिंड अर्पण करून होत असे. नंतर पितरांच्या नावाने भाताचे पिंड तयार करून पिंडदान करण्याची प्रथा पडली.
त्यानंतर पितरांच्या नावाने ब्राह्मण वा एखाद्या व्यक्तीला भाताची खीर, बेसनाचा लाडू, पाटवडी, पंचामृत इत्यादी पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत पडली.
भाद्रपद वद्य पक्षात आपली पितरे यमलोक सोडून मृत्युलोकी आपल्या कुटुंबीयांकडे राहण्यासाठी येतात, अशी श्रद्धा आहे.
पितरांचे श्राद्ध करण्यासाठी पितृपंधरवडा निवडण्यामागे काही कारणे आहेत.
उत्तरायण , दक्षिणायन असे ६-६ महिन्यांचे वर्षाचे दोन भाग आहेत.
प्राचीन काळी आपले पूर्वज ज्या भागात राहत होते, तेथे दक्षिणायन भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होत असे.
दक्षिणायन सुरू झाल्यानंतर पहिले पंधरा दिवस पितृपक्ष सुरू होत असे.
पित्तरांसाठी बळी देणे,यज्ञ करणे,काही दान करणे या काळात केले जात असे
आता तर दक्षिणायन व उत्तरायण यांचे स्वरूप बदलले आहे. पौष महिन्यात मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होऊन आषाढ महिन्यात संपते व नंतर दक्षिणायन सुरू होते.
कालमापन जरी बदलले असले तरी पितरांचा पक्ष म्हणून भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेनंतरचा पंधरा दिवसांचा काळ आहे, तो तसाच ठेवण्यात आला.
श्राद्धाच्या दिवशी आमंत्रित व्यक्तीस श्राद्धाचे जेवण घालून पितरांच्या नावाने दान द्यावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा