भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे चिंतन गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सर्वांनी करावे, ही सर्वांची गरज आहे.
कर्षति आकर्षति इति कृष्ण:|
' जो सर्वांचे आकर्षण करतो तो कृष्ण.'
अमेरिकेतील काही लोकांनी स्वामी विवेकानंदांना विचारले, 'अनेक बायकांना भुलवून हजारो स्त्रियांशी लग्न करणाऱ्या श्रीकृष्णास परमेश्वर मानून त्याच्या दर्शनासाठी तुम्ही भारतीय लोक घरदार सोडून का पळता?' हा प्रश्न विचारला तेव्हा स्वामीजी एका सभागृहात प्रवचन देत होते.
आपले भाषण सोडून स्वामीजी सभागृहाच्या बाहेर आले व रस्त्याने पळत निघाले.
सभागृहातील श्रोतेही त्यांच्यामागे पळू लागले. स्वामीजी एका चौकात थांबले. लोकही थांबले. थांबलेल्या लोकांना स्वामीजींनी प्रतिप्रश्न विचारला, 'हे प्रिय श्रोत्यांनो ! आपण रस्त्याने पळू लागलो तर लोक काय म्हणतील? याचा विचार न करता आपण सर्वजण माझ्यामागे पळत आलात, असे काय आहे माझ्यात ? म्हणून तुम्ही माझ्यावर एवढे प्रेम करता?
तेव्हा श्रोते म्हणाले, 'हे वीरवर ! आमच्या आत्म्याचे उत्थापन करण्याचे सामर्थ्य आपल्या वाणीत आहे.
त्या दिव्य वाणीच्या लोभाने आम्ही आपल्यावर प्रेम करतो. ते श्रवण करण्यासाठी आम्ही आपल्या मागे पळत आलो आहोत.
स्वामीजी आनंदाने सिंहगर्जना करून म्हणाले, 'हेच सामर्थ्य होते आमच्या श्रीकृष्णात !
कौरव-पांडवांच्या घनघोर युध्दासाठी कुरुक्षेत्रावर जमलेल्या अठरा अक्षौहिनी अर्थात ५१ लाख सैन्याच्या कोलाहलात आप्तेष्टांच्या मोहाने रडणाऱ्या अर्जुनाचे निमित्त करून सांगितलेल्या ७०० लोकांची १८ अध्यायाची गीता वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की, त्या श्रीकृष्णाच्या मागे लोक का पळतात?
त्यांच्या दिव्य वाणीचा मोह विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला का झाला?
सर्व वेद-उपनिषदांचा सार सांगणाऱ्या भगवद् गीतेने जातीधर्माचा भेद न करता जन्मलेल्या प्रत्येक माणसास परमेश्वराच्या सर्वोच्च पदावर आरूढ होण्याची पात्रता प्राप्त व्हावी म्हणून प्रयास केले.
गीतेला कोणताच भेद मान्य नाही. ती म्हणते - स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा,स्तेऽपि यान्ति परांगतिम् ||
या विश्वात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला परमपदाला जाण्याचा अधिकार आहे.
गीता जिव्हाळा संपन्न होण्याचा सल्ला देते.
अव्देष्टा सर्व भूतानाम्|| कोणाचा द्वेष करू नका, कारण द्वेषाने कधीच कोणाची प्रगती होत नाही.
या दिव्य वाणीचा मोह अनेक विद्वान लोकांना झाला, म्हणून तर शेकडो प्रकाशकांनी गीतेचे भाषांतर आपापल्या भाषेत करून तिचे पठण करून आत्मसात केले.
काही अर्धवट लोक अनेक बायकांचा दादला म्हणून श्रीकृष्णाची टीका करतात. परंतु भगवान श्रीकृष्ण जर ते व्यभिचारी असते तर त्यांचे वर्णन त्या काळात सर्वश्रेष्ठत्व प्राप्त झालेल्या श्रीव्यासांनी केलेच नसते.
श्री व्यासपुत्र त्यागमूर्ती शुकदेवांनी परिक्षितीला सांगितलेल्या भागवतात संपूर्ण दहावा स्कंद प्रभू श्रीकृष्णलीलांच्या वर्णनासाठी खर्च केला आहे.
श्रीकृष्ण व्यभिचारी असते तर, त्या त्यागमूर्तीने एकही शब्द श्रीकृष्ण वर्णनासाठी उच्चारला नसता.
तर श्रीकृष्णाचा आत्येभाऊ, मेहुणा व त्या काळातला सर्वश्रेष्ठ नरवीर व योद्धा अर्जुन आज्ञेत वागला नसता.
भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे चिंतन गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सर्वांनी करावे, ही सर्वांची गरज आहे.
आजही द्वारका, गिरी बालाजी, श्रीजगन्नाथपुरी, श्रीक्षेत्र पंढरपूर, व श्रीबद्रीनाथ या भगवान श्रीकृष्णाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थानी करोडो लोक जाऊन आपल्या अशांत मनाला शांत करून मोक्षाला जातात.
'श्रीमंती हा सर्वश्रेष्ठ अलंकार नसून, माणुसकी ही सर्वश्रेष्ठ श्रीमंती आहे' हे तत्व त्यांच्या सुदामाबरोबर असलेल्या मैत्रीतून जाणवते.
हजारो निरपराध माणसे वाचविण्यासाठी एक द्रोणाचार्य मेले तरी हरकत नाही व अनेकांच्या प्राणांचा बळी घेणारा एक द्रोणाचार्य मारण्यासाठी सत्यवचनी धर्मास 'नरो वा कुंजरो वा' हे खोटे बोलावे लागले तरी पाप नाही, हे मानवतेचे नीतिशास्त्र त्यांनी अमलात आणले.
द्रोपदीच्या शिलाचा अपमान करून नराधम शकुनी व दुर्योधन यांना साथ देणाऱ्या कर्णास मारताना त्यांनी युद्धातील परंपरागत चालत आलेले सर्व प्रचलित नियम धाब्यावर बसवून अन्याय मोडून काढला .
'माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही' हा त्यांचा सिद्धांत आजही तितक्याच मोलाचा आहे.
तुम्ही कितीही शुद्धचरणी व संत स्वभावाचे असलात परंतु कुटुंबाच्या व प्रतिज्ञेच्या मोहामुळे दुष्टाला व चुकीने वागणार्या व्यक्ती वा व्यक्तीच्या समूहाला तुमच्यामुळे पाप करण्यास सहकार्य मिळत असेल तर त्या व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही' हे त्यांनी शिखंडीला पुढे करून भीष्माचार्यांना शरपंजरी झोपवून सिद्ध केले व धर्माविरुद्ध उठलेले त्यांचे हत्यार म्यान करण्यास भाग पाडले.
'कोणतेही चांगले काम करताना लाजू नये' हे तत्त्व पांडवांच्या राजसूय यज्ञात उष्ट्या पत्रावळी काढून व कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करून जगासमोर मांडले.
'युद्धात मी शस्त्र हत्ती धरणार नाही' ही केलेली प्रतिज्ञा जेव्हा अर्जुनाच्या प्राणावर बेतले तेव्हा त्यांनी मोडली व ते भिष्माला मारण्यासाठी धावून गेले आणि 'सज्जनांच्या रक्षणासाठी वचनभंग केला तरी चालतो' हा धर्म त्यांनी जगासमोर मांडला.
गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण भक्तांना चालून आलेली पर्वणी !
हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या श्रावणात प्रभू श्रीकृष्ण जन्मले.
मुखी श्रीकृष्णनाम, हाती श्रीकृष्णकाम हृदयात श्रीकृष्णप्रेम जर असेल तर त्या श्रीकृष्णभक्तास जिवंतपणी सुख व मेल्यावर श्रीकृष्ण धाम निश्चित मिळेल.
गीतेचा आचार व बासरी होण्याचा विचार प्रत्येकाच्या मनात आला तर त्याला श्रीकृष्ण दर्शन होण्यास विलंब लागणार नाही.
अन्न, वस्त्र, निवारा, शरीर, आत्मा आणि या सर्वांची प्राप्ती व उपभोग घेण्याचे सामर्थ्य देणारा परमात्मा या माणसाच्या मूलभूत गरजा आहे.
तो आत्मा व परमात्मा म्हणजेच श्रीकृष्ण होय. हृदयात श्रीकृष्ण सत्ता, बोलण्यात श्रीकृष्णगाथा व मनात श्रीकृष्णचिंता असेल तर तो माणूस जन्म दरिद्री जरी असला तरी कुबेर झाल्याशिवाय राहणार नाही.
कौरवांजवळ सत्ता होती, परंतु श्रीकृष्ण नव्हते.
त्यांनी श्रीकृष्णाला सोडले आणि शकुनीला पकडले. त्यामुळे त्यांचा नाश झाला.
श्रीकृष्ण शांतीदुत होते. ते सामान्यांचे प्रतिनिधी होते.
पाच हजार वर्षांपूर्वी श्रावण मासाची संपन्नता होती परंतु वद्य अष्टमी ची काळ कभिन्न रात्र होते माणसाचे राज्य नष्ट होते त्याच्या राज्यात पाण्याचे ढग शिक्षेची कडाडणारी वीज दुःखाचा प्रचंड पाऊस असल्यामुळे सामान्य माणसाला फार त्रास सहन करावा लागत होता आणि त्याच वेळी भक्ती प्रेमाच्या रुदय रोग उखाण्यात भगवान श्री विष्णु कृष्ण रूपात जन्म घेतला व सर्वांचे दुःखहरण केले.
विश्व रक्षण करता श्रीकृष्ण कधीच स्वैराचारी तरुण व चिंताग्रस्त वृद्ध झाले नाहीत.
ते सदैव निरागस बालक होते. त्यांनी नृत्य केले,गायीचे, बासरीचे स्वर काढले व विश्वप्रसिद्ध गीतेचे तत्त्वज्ञान विश्वाला सांगितले ते मोकळे पणाने म्हणाले जन्म कर्मत समय दिव्यम्||गीता||
माझा जन्म व कर्म सारेच अद्भुत आहे.
गोकुळातील रासक्रीडा, स्वर्गातून आणलेला पारिजातक वृक्ष अशा अनेक लीला करणाऱ्या प्रभू श्रीकृष्णाला एकदा रुक्मिणीने विचारले, 'भगवान! मी आपल्याला कशी आवडते?' तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, 'तू मला मिठासारखी आवडतेस.'
प्रभू श्रीकृष्ण जीवनामध्ये निरागस, संगितमय, सुरेल व विनोदी जगले.
त्यांच्या शब्दांची उंची रुक्मिणीला समजली नाही.
दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने आचाऱ्याला मीठ न टाकता स्वयंपाक करायला सांगितला.
जेवावयास बसलेले सगळेजण मिठाची मागणी करू लागल्यावर रुक्मिणीला 'मिठाशिवाय जेवण व्यर्थ तसे आपल्याशिवाय प्रभूला आपले जीवन व्यर्थ वाटते' याची जाणीव झाली.
'या जन्मात आवडणारी वस्तू पुढच्या जन्मातही मिळावी यासाठी काय करावे?' असा प्रश्न सत्यभामेने नारदांना विचारल्यावर, 'ती वस्तू दान करावी' असे नारदांनी सांगितले.
सत्यभामेने प्रभू श्रीकृष्णाला दान दिले तेव्हा संपूर्ण द्वारकेत एकच कोलाहल माजला.
उन्मत्त दुर्योधनाच्या श्रीमंती स्वागताचा त्याग करून सात्विक विदुराच्या घरी जाऊन त्याच्या विदेही पत्नीच्या हातून केळांची साले आनंदाने भक्षण करणारा श्रीकृष्ण भक्तिप्रेमाने प्रसन्न होतो.
हे समजून घेण्यासाठी श्रावण वद्य ||१|| ते ||८|| असा श्रीकृष्णजन्माष्टमीचा उत्सव करून कृष्णलीला श्रवण करावी.
नवमीला दहीहंडीचा गोपाळकाला करून श्रीकृष्ण प्रसाद घेऊन श्रीकृष्णमय व्हावे.
बासरीचे स्वर, गोपीप्रेम, गीताज्ञान व निरपेक्षवृत्ती असलेले पूर्णपुरुष भगवान श्रीकृष्ण आज पंढरपूरक्षेत्री श्रीविठ्ठलरूपात भक्तांची वाट पाहत उभे आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा