आधुनिक काळात करण्यात आलेल्या उत्खनन व संशोधनावरून महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची माहिती उपलब्ध झालेली आहे.
पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने सध्याच्या महाराष्ट्रात अंतर्भूत असलेली गंगावाडी, नाशिकसारखी स्थळे प्रागैतिहासिक आदिपाषाण युगातील आहेत.
संगमनेरजवळ जोर्वे येथे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
तर कोल्हापूरजवळ ब्रह्मपुरी येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून दोन हजार वर्षापूर्वीच्या सांस्कृतिक जीवनाचे ज्ञान होते.
प्राचीन समाजाची व त्यांच्या सांस्कृतिक प्रगतीची माहिती देणारी ही ठिकाणे महाराष्ट्रात समाविष्ट होती.
आज महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जात असून, तो दक्षिणपथामध्ये समाविष्ट होता.
इसवी सन पूर्व काळात उत्तरेतील आर्यांनी या दंडकारण्यात प्रवेश करून तेथे वस्ती करण्यास प्रारंभ केला.
दंडकारण्याच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना रठ्ठ, महारठ्ठ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाण्यास सुरुवात झाली.
महारठ्ठ या प्राकृत रूपावरूनच महाराष्ट्र असे नाव प्राप्त झाले असावे.
महाराष्ट्राची लोकभाषा 'महाराष्ट्री' हिला इसवी सनापूर्वी इतर प्राकृत भाषांच्या मानाने मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळाली होती.
विविध संस्कृत व प्राकृत ग्रंथ, आलेख यात दक्षिणपथ व दंडकारण्याचे उल्लेख मिळतात.
पुराणांमध्ये या प्रदेशातील जनपदांची नावे ही दिलेली आहेत. तथापि या प्रदेशांच्या राजकीय इतिहासाची माहिती मिळत नाही.
त्यानंतर भारतात स्थापन झालेल्या मौर्यांचे राजकीय वर्चस्व या प्रदेशावर असावे.
आपल्या कारकिर्दीच्या शेवटी चंद्रगुप्ताने जैन धर्माचा स्वीकार करून तो दक्षिणेत आल्याची माहिती मिळते.
बिंदुसारने आक्रमण करुन हा प्रदेश जिंकल्याची माहिती तामिळ साहित्यात आढळते.
तर अशोकाच्या आलेखात आलेल्या वर्णनावरून महाराष्ट्राचा प्रदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट होता, असे दिसते.
त्यानंतर महाराष्ट्रावर सातवाहनांची स्वतंत्र सत्ता होती.
गोदावरीचे खोरे हा या साम्राज्याचा गाभा होता.
त्यांच्या साम्राज्यात सौराष्ट्र- राजस्थानचा आग्नेय भाग, माळवा, महाराष्ट्र इत्यादी प्रदेशांचा समावेश होता.
राजकीय शांततेमुळे या काळातील साम्राज्याचा सर्वांगीण विकास झाला.
पैठण, तेर या ठिकाणांना प्रसिद्ध व्यापारी केंद्रे म्हणून महत्व मिळाले.
सातवाहनांनंतर राष्ट्रकूटांनी सातारा, कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटकचा काही भाग यासह 'उत्तर कुंतल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशावर राज्य केले.
विदर्भाच्या प्रदेशावर वाकाटकांनी आपली सत्ता स्थापन केली.
मराठवाड्याचा प्रदेशही त्यांच्या ताब्यात असावा.
वाकाटकांच्या काळात विद्या, कला, साहित्य यांच्या विकासाला चालना मिळाली.
या नंतरच्या काळात राजकीय सत्तेचे केंद्रस्थान कृष्णा-तुंगभद्रेच्या प्रदेशात स्थिर झाले.
कर्नाटकातील चालुक्य व राष्ट्रकूट घराण्यांनी महाराष्ट्राच्या बहुतेक भागात राज्य केले.
यानंतर नासिक व गोदावरी यांच्यामध्ये असणाऱ्या "सेऊण" देशावर मांडलिक असलेल्या यादवांनी आपली सत्ता स्थापन केली.
नगर-पुणे, साताऱ्याच्या काही प्रदेशांवर त्यांनी आपले राजकीय वर्चस्व स्थापन केले.
यादवांचा कालखंड हा महाराष्ट्रात शांततेचा काळ होता.
त्यामुळेच या काळात विद्या, साहित्य, कला, व्यापार या क्षेत्रात समाजाची मोठी प्रगती झाली.
यादवांच्या काळात अल्लाउद्दीन खिलजीचे महाराष्ट्रावर आक्रमण झाले. त्याने यादवांचा पराभव केला आणि महाराष्ट्रात इस्लामी सत्तेचा प्रारंभ झाला.
१३४७ मध्ये अल्लाउद्दीन हसन बहमन शहा याने बहमनी सत्तेची स्थापना केली आणि दक्षिणेत कायमची इस्लामी सत्ता स्थापन झाली.
नंतरच्या काळात बहामनी सत्तेचे तुकडे होऊन पाच स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आले.
त्यामध्ये -
वऱ्हाडची -इमादशाही,
अहमदनगरची- निजामशाही,
विजापूरची- आदिलशाही,
बिदरची- बरीदशाही आणि
गोवळकोंड्याची- कुतुबशाही हे पाच राज्य अस्तित्वात आले.
या पाच राज्यांपैकी अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरच्या आदिलशाहीची महाराष्ट्राच्या प्रदेशावर दीर्घकाळ वर्चस्व होते.
अनेक पराक्रमी मराठा सरदारांच्या मदतीने इस्लामी सत्तांनी आपले वर्चस्व कायम टिकवले.
बहामनी सत्तेच्या स्थापनेपासून जवळपास तीनशे वर्ष महाराष्ट्राच्या प्रदेशावर इस्लामी सत्ता होती.
इस्लामी सत्तांनी मराठा सरदारांच्या मदतीने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.
या परकीय सत्तेला विरोध करण्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणीही मांडलेला किंवा समाजाने स्वीकारलेला दिसत नाही.
१७ व्या शतकाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात केलेली स्वतंत्र राज्याची निर्मिती ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारी घटना होती.
प्रतिकारहीन व औदासीन्यपूर्ण बनलेल्या समाजास 'गोब्राह्मणप्रतिपालक व धर्म रक्षण' या ध्येयाने प्रेरित करून कार्यक्षम बनविण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले.
स्वधर्म व स्वराष्ट्र यांच्या संरक्षणासाठी प्रसंगी आत्मार्पण करण्याची प्रेरणा त्यांनी येथील समाजात निर्माण केली.
स्वराज्यनिर्मिती करतानाच त्यांनी येथील समाजाचा स्वाभिमान जागृत केला.
मोगल, आदिलशाही, निजामशाही या सत्तांना पराभूत करून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली व स्वराज्याला स्थिर स्वरूप दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपल्या सर्व सामर्थ्यानिशी दक्षिणेत मराठ्यांची सत्ता नष्ट करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाचा मराठ्यांपुढे टिकाव लागला नाही.
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाईंच्या काळापर्यंत स्वधर्म रक्षणासाठी प्राणार्पणाची प्रेरणा कायम होती.
छत्रपती शाहूंच्या काळापासून मराठी सत्तेचे स्वरूप बदलले.
राष्ट्रहितापेक्षा वतनप्रेम मोठे वाटण्यास प्रारंभ झाला.
छत्रपतींची सत्ता कमकुवत बनली.
पेशवे राज्यकारभाराचे प्रमुख बनले.
पहिल्या चार पेशव्यांनी मराठ्यांच्या सत्तेचा उत्तर भारतात विस्तार करण्यात यश मिळवले.
मराठी सत्तेला भारतात एक श्रेष्ठ सत्ता म्हणून स्थान मिळाले.
१७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर या सत्तेला उतरती कळा लागली.
मराठ्यांच्या सत्तेला पुन्हा वैभवाचे स्थान मिळवून देण्याचे पहिल्या माधवराव पेशवे यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
या नंतरच्या काळात पेशव्यांच्या सत्तेवर अकार्यक्षम पेशवे आल्याने मराठ्यांची सत्ता कमकुवत बनत गेली.
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात इंग्रजांनी मराठ्यांचा पूर्ण पराभव करून महाराष्ट्रावर आपले राजकीय वर्चस्व स्थापन केले.
इ.स. १८१८ ते १९४७ या सुमारे १३० वर्षांच्या काळात भारताप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रजेलाही पारतंत्र्यात राहावे लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलेल्या ध्येयाचा नंतरच्या काळात पडलेला विसर, राष्ट्रहितापेक्षाही आपल्या वतनाविषयी वाटणारे विशेष प्रेम व त्या वतनाच्या रक्षणासाठी प्रसंगी स्वजनांशीही संघर्ष करण्याची वाढलेली प्रवृत्ती, परस्परांतील संघर्ष, अकार्यक्षम, नीतीशून्य मध्यवर्ती सत्ता मराठ्यांच्या सत्तेच्या विनाशाला कारणीभूत ठरली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा