भाग २
काशी :
प्राचीन काळापासून थोर विद्वानांचे माहेरघर असलेल्या काशी या विद्याकेंद्रातच उपनिषदांची निर्मिती झाली.
हिंदू, जैन, बौद्ध धर्म व धर्मपंथाचे हे उगमस्थान आहे.
प्रत्येक धर्म संस्थापकांनी आपल्या प्रचाराची मोहीम येथूनच सुरू केल्याचे आढळते.
धन्वंतरीच्या काळापासून काशी हे सर्व शास्त्रांचे व कलांचे माहेरघर म्हणून समजण्यात येते.
काशी-बनारस प्रामुख्याने वैदिक धर्म, संस्कृत भाषा व आयुर्वेद शिकवणारे विद्याकेंद्र होते.
आयुर्वेदातील प्रसिद्ध धनवंतरी संप्रदाय हा काशी या नगरातच उगम पावला.
असे असले तरीही हिंदू, जैन,बौद्ध या तीनही संस्कृतींचा संगम येथे पाहावयास मिळतो.
सम्राट अजातशत्रू व राजा अशोक यांच्या आश्रयाखाली येथील विद्वानांना सहाय्य मिळाल्याने हे विद्याकेंद्र मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीस आले.
तेव्हापासून आजतागायत या विद्याकेंद्राची शैक्षणिक व सांस्कृतिक भरभराट अव्याहतपणे चालू आहे.
काशी हे प्रामुख्याने धार्मिक शिक्षणासाठी प्रसिद्ध असल्याने इतर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तक्षशिला येथेच जावे लागे.
उज्जैनी (अवंती):
हे विद्याकेंद्र महाभारत काळापासून प्रसिद्ध असून येथेच भगवान श्रीकृष्ण व बलराम यांनी सांदिपनी ऋषींच्या आश्रमात वेदाध्ययन केले होते.
या भागात महाभारतकालीन सांदिपनी, चंडप्रद्योत काळातील महाकात्यायन, बृहत्कथाकार गुणाढ्य, विक्रमादित्य यांच्या काळातील कवी कालिदास, धन्वंतरी निघण्टु, अमरकोश कर्ता अमरसिंह, वररुचि, हरिश्चंद्र, भट्टारक, रसायनशास्त्रज्ञ व्याडी, पंडित बाणभट्ट, मयूर कवी, दंडी इत्यादी. तसेच राजा भोज यांच्या काळातील महाकवी धनपाल व नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ यांची ही कर्मभूमी होय.
खगोलशास्त्रज्ञ वराहमिहीर त्यांचे जन्मगाव 'कापिल्यक' हे उज्जैननजिकच होते.
कांजीवरम ( कांची) (इ.स.पूर्व १००० ते १२००)
दक्षिण भारतातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर पल्लव राज्यकर्त्यांची राजधानी होती.
परंतु हे शहर राजधानीपेक्षा दक्षिणेकडील श्रेष्ठ विद्यापीठ म्हणूनच प्रसिद्ध होते.
आयुर्वेदाचार्य रसशास्त्रज्ञ नागार्जुन हा या विद्यापीठात काही काळ अध्यापनाचे कार्य करीत होता.
तसेच कामसूत्रकार वात्स्यायन, चरक,सुश्रुत आदि वैद्यकशास्त्रज्ञ या विद्यापीठाशी संबंधित होते.
प्रामुख्याने कांची विद्यापीठ स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध होते.
दक्षिणेकडे मंदिर स्थापत्याची निर्मिती येथूनच घडली.
वल्लभी -
काठेवाडातील प्रसिद्ध व्यापारी केंद्र व शिक्षण केंद्र म्हणून वल्लभी प्रसिद्ध आहे.
तेथे शंभर विहार असून ४००० विद्यार्थी शिक्षण घेत होते, असे चिनी प्रवासी इत्सिंग याने लिहिलेले आहे.
अर्थशास्त्र, गणित, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जात होते.
याशिवाय वल्लभी (सौराष्ट्र) विद्यापीठात व्याकरण, लेखन, ज्योतिष, नृत्य, संगीत आदि ७२ विषयांचे ज्ञान दिले जाई.
हे विद्वत्तेचे माहेरघर मानले जाई.
विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर कोरली जात.
व्यापारी केंद्र असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असे.
गुणशीला -
हे विद्यापीठ जैन राज्यकर्त्यांच्या काळात इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास उदयास आले.
या विद्यापीठामध्ये व्यायामापासून ते नखे कलात्मकरीत्या कशी कापावीत इथपर्यंत ६४ कलांचे शिक्षण दिले जाई.
हे विद्यापीठ प्रामुख्याने स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे होते.
कुंडिनपुर विदर्भ-
हे व्यायामशास्त्र,मुष्टियुद्ध यासाठी प्रसिद्ध होते.
याबरोबरच अयोध्या, मिथिला,जागदूल, नवदीप, उदंतपुरी, प्रतिष्ठान,नाशिक ही प्रसिद्ध विद्याकेंद्रे होती.
विजयनगर (हम्पी), कलिंग, कोकण या भागातील छोटी-मोठी विद्याकेंद्रे मुस्लीम आक्रमणापासून दूर असली तरी ती काही काळ टिकून होती.
परंतु कालांतराने राजाश्रयाअभावी ती नष्ट झाली.
प्राचीन भारतातील विद्यापीठे हा भारतीय शैक्षणिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा एक मानबिंदू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा