१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, जाणून घेऊ या दिवसाचे महत्त्व...
महाराष्ट्राला वैभवशाली ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. रयतेमध्ये स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा व स्व-संस्कृतीविषयी जागृती घडवून आणली.
यामुळे मराठी माणसांमध्ये अस्मिता निर्माण झाली.
१८१८ मध्ये मराठी सत्ता नष्ट होऊन त्यांची जागा इंग्रजांनी घेतली.
इंग्रजांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे देशात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली.
महाराष्ट्रात या चळवळीला वेग आला. अनेक समाजसुधारकांनी समाज प्रगतशील व पुरोगामी होण्यासाठी समाजसुधारणा चळवळ गतिमान केली.
धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक जागृती होऊन भारतीयांमध्ये राष्ट्रवाद वाढीस लागला.
यातूनच राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागून इ.स.१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला.
भाषावार प्रांतरचनेची मागणी वाढीस लागली.
महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इ.स. १९४६ पासून सुरू झाली.
अनेक स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
मराठी भाषिक लोकांच्या महाराष्ट्राच्या एकीकरणाचा विचार २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली.
त्या दृष्टीने साहित्य संमेलनांचा वाटा महत्त्वाचा ठरतो.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या ऋणानुबंधमध्ये लिहितात, मराठी भाषकांच्या एकीकरणाची ओढ साहित्य संमेलनातून निर्माण झाली.
१९०८ च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैद्य यांनी एकीकरणाचा उल्लेख केला होता.
तेव्हा महाराष्ट्राच्या एकीकरणाशी संमेलनाचा निकटचा संबंध आहे.
याप्रमाणे अनेकांनी महाराष्ट्राच्या एकीकरणाची स्वप्न १९१० पासून पाहिली होती.
१९११ इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली.
त्यासंदर्भात भाषा व राष्ट्रीयत्व या शिर्षकाखाली केसरीमध्ये न.चि. केळकर यांनी लिहिले की, मराठी भाषा बोलणार्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी.
लोकमान्य टिळकांनी १९१५ साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती.
आपल्या दैनिक 'केसरी'तून त्याचे महत्व व आवश्यकता त्यांनी जनतेला समजावून सांगितली होती.
परंतु त्या दरम्यानच्या काळात देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने या विषयाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही व ते साहजिकही होते. तेव्हा सामान्य मराठी माणसापर्यंत हा विषय गेला नाही.
पण आंध्र व कर्नाटकच्या लोकांनी आपल्या चळवळी लवकर सुरू केल्या होत्या.
महाराष्ट्रात तशा काही हालचाली होत नाहीत, याचे पटवर्धनांना वाईट वाटत होते.
म्हणून त्यांनी या विषयाला चालना देण्यासाठी प्रश्नावलीच्या रुपाने ४० पुढार्यांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या.
त्यामध्ये रामराव देशमुख, अनुसयाबाई काळे, डॉ. टी.जे. केदार इत्यादींचे विचार होते.
१ ऑक्टोबर १९३८ साली वऱ्हाडचा वेगळा प्रांत करावा, असा ठराव मांडला.
१९३९ साली अहमदनगर येथे भरलेल्या साहित्य संमेलनात मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवावा आणि त्याला संयुक्त महाराष्ट्र असे नाव द्यावे, असा ठराव संमत झाला.
२८ जानेवारी १९४० साली देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र संघटना स्थापन झाली.
२४ मे १९४० रोजी केदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरविण्यात आली.
त्यांच्या मते, जो महाराष्ट्रात जन्मला व येथे कायम त्याचे वास्तव्य आहे, तो महाराष्ट्रीयन.
असे स्पष्ट करून सर्व मराठी भाषा बोलणाऱ्यांचे एक राज्य व्हावे, अशी त्त्यांनी मागणी केली. तर महाविदर्भ व्हावा, असे लोकनायक बापूजी अणेंना वाटत होते.
त्यांच्या मते, एकच भाषा बोलणाऱ्यांची दोन राज्य झाले तर काही बिघडणार नाही.
संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यात मराठी भाषिकांना खूप त्रास सहन करावा लागला.
कारण या आंदोलनात समोर अनेक अडथळे होते.
यात प्रामुख्याने राष्ट्रीय नेत्यांचा दृष्टिकोण, मराठी भाषिकांतील एकतेचा अभाव, मुंबई काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व, मराठी लोकांना मराठ्यांचा विरोध, मोरारजी देसाई यांचा विरोध इत्यादी.
स्वतंत्र महाराष्ट्र राज्यनिर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्र देणं नाकारलं होतं.
मराठी माणसांपासून मुंबई तोडली जात असल्याची चीड त्यावेळी मराठी माणसांच्या मनात होती.
२१ नोव्हेंबर १९५६ रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक भव्य मोर्चा फ्लोरोफाउंटन समोरील चौकात जमला.
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
पोलिसांना हा मोर्चा आवरेना, त्यांनी लाठीचार्ज केला, तरीही जमाव पांगला नाही.
त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिला.
या गोळीबारात १०६ जण हुतात्मा झाले.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या या १०६ सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरोफाउंटनजवळ १९६५ मध्ये उभारले.
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण १ मे या दिवशी केले जाते.
१ मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' म्हणूनही ओळखला जातो.
सन १७६४ ला सूत काढण्याचा शोध लागला. तसेच औद्योगिक क्रांतीला सुरवात होऊन कामगार व त्यांच्या हक्कांचा प्रश्न निर्माण झाला.
अमेरिकेत शिकागो येथील कामगारांनी हा दिवस १८८६ साली साजरा केला.
त्यांनी कामाचे ८ तास असावेत, अशी मागणी केली.
१ मे ला शिकागो येथे कामगारांनी मोठी मिरवणूक काढली. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस संपन्न करण्याचे ठरले व त्याला १ मे १८९० ला संपूर्ण जगात पाठिंबा मिळाला.
भारतात चेट्टीयार यांनी १९२३ ला हा दिवस साजरा केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा