इतिहासातील महान स्त्री व्यक्तिमत्त्वाविषयी थोडेसे….
आपल्या देशात अनेक महान स्त्री-पुरुष होऊन गेले.
ज्यांच्या द्रष्ट्या विचाराने, क्रांतिकारक कृतींनी आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याच्या उर्मीने आपल्या देशाचे,समाजाचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.
त्यांच्या संघर्षमय जीवनाचे संस्कार आपल्यावर होत राहिले.
भारतीय इतिहासातील एका महान स्त्री- व्यक्तिमत्त्वाविषयी म्हणजेच राजमाता जिजाबाईं विषयी थोडेसे…
शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी वीरमाता जिजाऊंनी शिवरायांना प्रोत्साहन दिले.
त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या.
जिजाबाईंसारख्या द्रष्ट्या आणि लढाऊ स्त्रीचे चरित्र म्हणजे महाकाव्यच आहे.
जिजाबाईंना स्त्री शक्तीचा आविष्कार म्हटले जाते.परंतु या आविष्काराचे प्रकटीकरण त्यांच्या जीवनातील ज्या घटनांमुळे झाले, त्या घटना म्हणजे एक-एक अग्निदिव्यच होते.
काही अग्निदिव्य तर त्यांच्यावर नियतीने लादली होती, तर काहींमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.
जिजाऊंना वीरकन्या, वीरपत्नी आणि वीरमाता म्हटले जाते, परंतु या तीनही उपाध्यांची जबरदस्त किंमत त्यांना मोजावी लागली होती.
राजमाता जिजाऊंचा जन्म महाराष्ट्रातील यादवांचा वारसा सांगणाऱ्या जाधव या विख्यात मराठा कुळात झाला.
सरदार लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या त्या कन्या.
पराक्रमी पित्याचे रक्त या वीरकन्येच्या धमन्यांतून वाहत होते.
या वीराच्या कन्येचा विवाह दुसऱ्या वीराच्या वीरपुत्राशी म्हणजेच शहाजीराजे यांच्याशी झाला.
भोसले घराणे उदयपूरच्या सिसोदिया घराण्याचा वारसा सांगणारे.
शहाजीराजे हे निजामशाही, मोगलशाही व आदिलशाही या तीनही शाह्यांमध्ये असामान्य पराक्रम गाजवून दक्षिणेतील एक बलाढ्य सेनानी म्हणून वावरत होते.
शहाजी राजांनी निर्माण केलेली निजामशाही म्हणजे एका अर्थी मराठ्यांचे राज्य होते.
देश मराठी, लढणारे मराठे आणि पुन्हा शाही निर्माण करण्याची ताकद असणाराही मराठाच.असा पराक्रमी पती लाभला, म्हणून केवळ जिजाबाईंना वीरपत्नी म्हणणे अपुरे ठरेल.
कारण शहाजीराजांच्या कर्तबगारीच्या काळातही त्यांनी आपली स्वतंत्र बुद्धी जागृत ठेवली होती.
काही व्यक्ती या, त्यांना जीवनात मिळालेल्या स्थैर्यातून घडत असतात, तर काही व्यक्तींवर होणारे आघात, त्यांच्यावर आलेली संकटे त्यांना असामान्य बनवत असतात.
जिजाबाईंवरच्या आघाताने त्यांना वीरमाता बनवले.
स्वजन, स्वदेश या संकल्पना मराठ्यांच्या स्मृतीतून नष्ट झाल्या होत्या.
त्यामुळेच तर शुल्लक कारणावरून जाधव-भोसले या घराण्यांमध्ये संघर्ष होऊन जिजाबाईंचे बंधू दत्ताजी यांसकडून त्यांचे चुलत दीर संभाजी मारले गेले.
जिजाबाईंना बसलेला हा पहिला धक्का होता.
जिजाबाईंच्या घरातील अशी अनेक माणसे स्वकीयांच्या इर्षेपायी आणि परकीयांच्या चाकरीपायी मारली गेली.
त्यांच्यावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे त्यांचे पिता व भावांच्या हत्येचा.
निजामशहाने भर दरबारात भेटीस आलेल्या लखुजीराजे जाधव आणि त्यांचे पुत्र अचलोजी, राघोजी आणि नातू यशवंतराव यांची भीषण कत्तल केली.
पूर्वाश्रमीच्या देवगिरीच्या यादवांच्या दरबारात जिजाबाईंचे माहेर उद्ध्वस्त झाले.
त्यानंतर सहा महिन्यांनी शिवाजीचा जन्म झाला. म्हणजे गरोदर अवस्थेत असतानाच त्यांचे माहेर कापले गेले.
शहाजीराजे हे यवनी सत्तांच्या वावटळीत सापडले होते.
सर्वत्र भीषण दुष्काळ पसरलेला होता. या सर्व परिस्थितीचा जबरदस्त परिणाम जिजाबाईंवर झाला.
स्वराज्याची संकल्पना शहाजीराजे भोसले यांनी मांडली आणि त्यांची पूर्तता त्यांचे पुत्र शिवाजी महाराजांनी केली.
मराठी स्वराज्य स्थापन करण्याच्या कामात जिजाऊंनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले आणि त्यादृष्टीने उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली.
संपूर्ण महाराष्ट्र यवनी सत्तेच्या सामाजिक आणि राजकीय जुलुमाखाली भरडला जात होता.
'ज्याचं राज्य त्याचा धर्म' या न्यायाने धार्मिक असहिष्णुता शिगेला पोहोचली होती.
स्त्रियांचा शिलभंग होत होता.जिजाबाईंचा चुलत दीर खेळोजी राजे यांची पत्नी पंचवटीतील गोदावरी नदीवर स्नानासाठी गेली असता मोगल सरदार महाबतखानाने तिला घोड्यावरून पळवून नेले.
जिजाबाईंच्या जावेची ही अवस्था तर सर्वसामान्य स्त्रीच्या जगण्याची कल्पनाच न केलेली बरी!
प्रजेची अशी दुरावस्था असताना मराठा घराणी मात्र खोट्या प्रतिष्ठेच्या आणि सत्तास्पर्धेच्या आहारी गेलेली.
त्यांच्या रक्तात स्वाभिमानशून्यता भिनली होती.
या सर्व गोष्टींचा जिजाबाईंच्या विचारशक्तीवर जबरदस्त परिणाम झाला. यांच्या गुलामी मानसिकतेची सल आहे आणि आप्तजणांना या गुलामीखतार गमावल्याचे दुःखदेखील आहे.
शिवरायांना घडविणाऱ्या आणि त्यांच्या आराध्य दैवत असलेल्या माँसाहेब जिजाबाई या शिवरायांचे रायगडावर राज्यारोहण झाल्यावर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाचाड' या गावी १७ जून १६७४ ला त्या देवाघरी गेल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा