प्रकरण १६ स्वराज्य ते साम्राज्य
प्रस्तावना -
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली.
विभागलेल्या, परस्परांमध्ये भांडणाऱ्या आणि मरगळ आलेल्या मराठी माणसांचे संघटन करून त्यांना स्वातंत्र्याच्या विचाराने भारावून टाकले.
महाराजांनी स्वत्व आणि स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वराज्य, स्वधर्म, स्वदेश, स्वसंस्कृती, स्वभाषा यांच्या रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा दिली.
महाराजांनी आदिलशहा, मुघल, सिद्दी, पोर्तुगीज या प्रबळ सत्तांशी संघर्ष करून मराठ्यांची सत्ता स्थिर केली.
आपल्या सत्तेचा उपयोग लोककल्याणकरीता केला.
रयतेला त्रास ठरणाऱ्या वतनदारी व्यवस्थेविरुद्ध कणखर धोरण राबवले.
प्रशासनामध्ये जात, धर्म असा भेद न करता रयतेच्या कल्याणासाठी समतेचे धोरण अंगीकारले.
मराठी भूमीतील सर्व जाती, पंथातील लोकांचे सहकार्य हा शिवरायांच्या स्वराज्याचा मुख्य आधार होता.
केवळ स्वराज्यातील नव्हे तर शत्रू प्रदेशातील स्त्रिया, परधर्मी प्रार्थनास्थळे, धर्मग्रंथ यांचा आदर करून राजांनी त्यांचे राज्य निर्माण केले.
स्वतःची राजधानी, आरमार, लष्करी प्रशासन व अष्टप्रधान मंडळ इत्यादींची उभारणी करून आपल्या स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची प्रचिती दिली.
राज्याभिषेक करून त्यांनी सत्तेला धार्मिक अधिष्ठान मिळवून दिले.
स्वराज्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र बदल केला.
मराठ्यांच्या इतिहासाचे दोन कालखंड पडतात.
१. शिवशाही २. पेशवाई.
अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला आणि दक्षिण भारतात दिल्ली सुलतानांची राजवट सुरू झाली.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात राज्य केले. बहामनी राज्याचे विघटन होऊन महाराष्ट्रात निजामशाही, आदिलशाही या सत्तांचा अंमल होता.
दक्षिणेच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा प्रयत्न मुघलांनी सुरू केला. त्यातून निजामशाही संपुष्टात आली.
अशारीतीने सतराव्या शतकाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी सत्तेचा उदय झाला.
संतांची कामगिरी --
प्रश्न- संतांची कामगिरी लिहा.
लोक दैववादाच्या आहारी गेले होते. कारण समाजावर अंधश्रद्धा व कर्मकांडाचा जबरदस्त पगडा होता.
रयतेची प्रयत्नशीलता थंडावली होती.
रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील संतांनी केले.
संतांनी लोकजीवनाला वेगळे वळण लावण्याचे ऐतिहासिक कार्य केले.
त्यांनी लोकांच्या मनात आपला प्रदेश, आपले साहित्य, संस्कृती याविषयी स्व:भावना निर्माण केली.
लोकांना समता व मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, ही त्यांची शिकवण होती.
चक्रधरांनी पंथीय भाषा म्हणून मराठीचा अंगीकार केला.
संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली आणि लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.
स्वराज्याची स्थापना व विस्तार -
सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात निजामशाही व आदिलशाही या दोन राजवटी महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झाल्या होत्या.
या दोनही शाह्यांच्या दरबारात पराक्रमी मराठा सरदारांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती.
या मराठा सरदारांच्या जहागिरी सह्याद्रीच्या परिसरात अत्यंत दुर्गम भागात होत्या. या सरदारांचे अस्तित्व एखाद्या स्वतंत्र राजा प्रमाणेच होते.
शहाजीराजे हे या विषयातील एक मातब्बर सरदार होते.
प्रश्न - शहाजीराजांच्या कीर्तीचे थोडक्यात वर्णन करा.
शहाजी राजे हे निजामशाहीतील एक मातब्बर सरदार होते.
निजामशाहीच्या अस्तानंतर त्यांनी आदिलशाहीची मनसबदारी पत्करली.
शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान व श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले.
पुणे, सुपे, शिरवळ, इंदापूर, चाकण येथील प्रदेश जहागीर म्हणून मिळाले होते.
स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती.
म्हणूनच त्यांना स्वराज्याचे संकल्पक म्हटले जाते.
प्रश्न- शहाजीराजांना स्वराज्याचे संकल्पक म्हटले जाते.
स्वराज्य स्थापन करावे, ही शहाजीराजांची तीव्र इच्छा होती. याच उद्देशाने त्यांनी शिवराय, जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकारी बरोबर देऊन बंगळूरहून पुण्याला पाठवले.
त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी वीर माता जिजाबाईंनी शिवरायांना प्रोत्साहन दिले.
त्या कर्तबगार व राजनीतिज्ञ होत्या.
स्वराज्याची संकल्पना शहाजीराजे भोसले यांनी मांडली व तिची पूर्तता त्यांचे पुत्र शिवाजी महाराजांनी केली. म्हणून शहाजीराजांना स्वराज्याची संकल्पक म्हटले केले जाते.
प्रश्न - वीर माता जिजाबाई यांची कामगिरी लिहा.
शहाजी राजे यांच्या पत्नी जिजाबाई कर्तबगार आणि दृष्ट्या राजनीतिज्ञ होत्या.
शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले.
शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले.
शिवरायांच्या शिक्षणाची त्यांनी उत्तम व्यवस्था केली.
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली.
प्रश्न - कोणत्या बाबी स्वराज्याच्या स्थापनेत सहाय्यभूत ठरल्या?
शिवरायांचे अत्यंत पराक्रमी व कुशल नेतृत्व, बरोबरीने महाराष्ट्राची भौगोलिक रचना, स्थानिक मावळ्यांचा सहभाग, निजामशाही आणि आदिलशाहीच्या सेवेत असताना सरदारांना मिळालेले प्रशासकीय आणि लष्करी अनुभव अशा अनेक बाबी स्वराज्य स्थापनेसाठी सहाय्यभूत ठरल्या.
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली; कारण - मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्या-खोऱ्यांचा व दुर्गम होता.
सह्याद्रीच्या डोंगररांगामधल्या खोर्याला मावळ आणि या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना 'मावळे' म्हणत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांचा स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग होता.
शिवाजी महाराजांनी मावळच्या लोकांमध्ये विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केली.
शहाजी महाराज आदिलशाहीत रुजू झाल्यानंतर त्यांनी पुणे, सुपे परगण्यातील जहागिरीचा कारभार शिवरायांकडे सोपवला.
परंतु या जहागिरीतील आणि आसपासचे किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात होते.
शिवाजी महाराजांनी किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली; कारण या काळात 'ज्याचे किल्ले त्याचे राज्य' अशी परिस्थिती होती.
त्यामुळे शिवाजी महाराजांनी किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
प्रश्न- स्वराज्य स्थापनेतील प्रारंभिक घटना विशद करा.
शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला सर करुन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली.
'राजगड' येथे स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन केली.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी मावळीचा मोक्याचा प्रदेश ताब्यात घेतला; कारण चंद्रराव मोरे स्वराज्यविस्ताराच्या आड येत होता.
त्यानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या.
कल्याण आणि भिवंडी घेतल्यानंतर स्वराज्याची सीमा समुद्राला भिडली.
इंग्रज, फ्रेंच मिठाचा व्यापार करत होते.
महाराजांना समुद्रावर सत्ता हवी होती.पण महाराजांजवळ लढाऊ गलबते कशी बांधायची, ही माहिती नव्हती.
पोर्तुगीजांना सिद्धीचे भय असल्यामुळे महाराजांनी पोर्तुगीजांना भासवले की, ते सिद्धीविरुद्ध लढा देणार आहेत.
रूय लैतांव व्हियेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हियेगसया लढाऊ चहाचे बांधणाऱ्या जाणकारांनी सोबत महाराजांनी निवडक कोळी धाडले व त्यांच्याकडून २० लढाऊ नौका तयार करून घेतल्या.
१६७५ पर्यंत महाराजांकडे ४०० छोट्या-मोठ्या युद्धनौका होत्या.
सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत महाराजांनीही गलबते सुरतेच्या किनाऱ्यावर आणली होती.
या घटनेवरून सहज लक्षात येईल की, महाराजांनी जमिनीबरोबरच समुद्रावर सत्ता स्थापन केली.
शिवाजी महाराजांचा पोवाडा दूरदृष्टी होती.
म्हणूनच शिवाजी महाराज 'भारतीय आरमाराचे जनक' म्हणून ओळखले जातात.
मायनाक भंडारी, दौलतखान कान्होजी आंग्रे यासारखे योध्दे पुढे आले.
महाराजांच्या वाढत्या हालचालींचा धोका लक्षात आल्यामुळे विजापूरकरांनी अफजल खान या सरदारास त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले.
प्रश्न - अफजलखानाबरोबरच्या संघर्षाचे वर्णन करा.
शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींनी सावध झालेल्या विजापूरच्या दरबाराने महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजलखानास पाठवले; कारण महाराजांच्या वाढत्या हालचालींचा धोका त्यांच्या लक्षात आला.
महाराजांना संपविण्याचा विडा उचलून आलेल्या अफजलखानाची कपटबुद्धी ओळखून शिवाजी महाराज पूर्ण तयारीनिशी प्रतापगडावर त्याला सामोरे गेले.
अपेक्षेप्रमाणे अफजलखानाने दगाफटका करण्याचा प्रयत्न करताच शिवरायांनी त्याचा डाव त्याच्यावरच उलटवला.
महाराजांनी अफजलखानाला ठार मारले; कारण - त्याने दगाफटका करण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या सैन्याला पळताभुई थोडी करून त्यांनी आणलेला मोठा खजिना, शस्त्रसाठा ताब्यात घेतला.
त्यामुळे स्वराज्याच्या तिजोरीत लक्षणीय भर पडली.
अफजलखानाचे पारिपत्य झाल्याचे समजताच विजापूर दरबाराने सिद्दी जोहरला स्वराज्यावर पाठवले.
प्रश्न- 'पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका' या घटनेचे वर्णन करा.
अफजलखानाच्या पारिपत्यानंतर विजापूर दरबाराने सिद्दीजोहरला स्वराज्यावर पाठवले.
त्यांनी पन्हाळा किल्ल्याला वेढा घालून शिवरायांना कोंडीत पकडले.
बिकट प्रसंगी स्वराज्याचा एकनिष्ठ सेवक शिवा काशिद यांनी स्वतः शिवरायांचा सुटकेचा मार्ग सुकर केला.
खरा प्रकार उघडकीस आल्यावर सिद्दीने शिवा काशीदला ठार केले.
अशा तऱ्हेने स्वराज्यासाठी प्राणार्पण केले.
शिवरायांचा पाठलाग करणाऱ्या सिद्धी मसूदला घोडखिंडीत रोखण्याचे कार्य बाजीप्रभू देशपांडे यांनी केले.
बाजीप्रभू यांनी वीरमरण पत्करून शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचू दिले.
दिल्लीच्या तख्तावर नव्याने आलेल्या औरंगजेबाने शिवरायांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेची दखल घेतली नसती तर नवल.
त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला मोहिमेवर पाठवले.
प्रश्न- शाहिस्तेखानाला लालमहाल सोडणे भाग पडले.
औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान यास शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याच्या मोहिमेवर पाठवले होते.
मुक्काम पुण्याला लाल महालात होता.
शिवरायांनी अत्यंत हिकमतीने लाल महालात प्रवेश करून शाहिस्तेखानावर हल्ला केला.
त्यात त्याची बोटे कापली गेली, म्हणून शाहिस्तेखानाला लाल महाल सोडणे पडले.
आत्मविश्वास वाढलेल्या शिवरायांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी मानल्या गेलेल्या संपन्न अशा सुरत शहरावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात लूट केली.
या प्रकाराने संतप्त झालेल्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेरखान या मातब्बर सरदारांना स्वराज्यावर पाठवले.
प्रश्न - शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगाबरोबर पुरंदरचा तह केला.
सुरतवरील हल्ल्याने संतप्त झालेल्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंह व दिलेरखान यांना स्वराज्यावर पाठवले.
त्याने स्वराज्यातील अनेक किल्ले ताब्यात घेतले.
प्रसंग ओळखण्यात वाकबगार असलेल्या महाराजांनी तात्पुरती माघार घेऊन मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर पुरंदरचा तह केला.
त्यानुसार महाराजांना पुत्र संभाजी राजांसह आग्रा येथे औरंगजेबाचे भेटीला जावे लागले.
तेथे औरंगजेबाने दगाबाजी करून महाराजांना नजरकैदेत ठेवले.
महाराजांनी अत्यंत शिताफीने पहारेकर्यांच्या हातावर तुरी देऊन सुटका करुन घेतली.
स्वराज्यात परत आल्यावर महाराजांनी अल्पावधीतच औरंगजेबाला द्यावे लागलेले किल्ले परत जिंकून घेतले.
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला; कारण स्वराज्याला मान्यता प्राप्त व्हावी.
या उद्देशाने शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जिंकलेल्या प्रदेशांना एकत्रित राज्याचे स्वरूप आले.
राज्याभिषेकानंतर महाराजांनी कर्नाटक मोहीम राबवली.
दक्षिण विजयानंतर अल्पावधीतच महाराजांचे ३ एप्रिल १६८० मध्ये निधन झाले.
त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली.
मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम -
छत्रपती संभाजी महाराज -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर युवराज संभाजी छत्रपती झाले.
छत्रपती संभाजी महाराजांना सिद्दी, पोर्तुगीज आणि मुघल यांच्याबरोबर सतत संघर्ष करावा लागला.
मराठ्यांचे स्वातंत्र्य संपवण्यासाठी खुद्द औरंगजेब प्रचंड सैन्यानिशी महाराष्ट्रात उतरला.
छत्रपती संभाजींच्या शौर्यामुळे शत्रूला फार मोठी दहशत बसली होती.
इसवीसन १६८९ मध्ये संगमेश्वर येथे शेख निजामाने (मर्करबखान) छत्रपती संभाजी व कवी कलश यांना पकडले.
औरंगजेब बादशहाच्या आज्ञेने भीमानदीच्या तीरावर वढू बुद्रुक येथे ११ मार्च १६८९ रोजी उभयतांना अत्यंत क्रुरपणे ठार मारले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या निधड्या छातीने शरणागतीचा एक शब्दही न काढता जे वीरमरण पत्करले ते महाराष्ट्राला सदैव प्रेरणादायी ठरले आहे.
संभाजी महाराजांच्या स्वातंत्र्यदेवतेचे होमकुंड प्रज्वलित झाले.
सुडाने पेटून उठलेल्या मराठी समाजाला चिरडून टाकणे औरंगजेबाला कदापि शक्य झाले नाही.
संभाजी महाराजांचा आणखी एक उल्लेखनीय गुणविशेष म्हणजे ते संस्कृत पंडित होते.
छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला.
'बुधभूषण' या संस्कृत ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांनी काव्यालंकार, शास्त्रे,पुराणे, संगीत आणि धनुर्विद्या यांचा सखोल अभ्यास केला होता.
छत्रपती संभाजी राजांनी 'बुधभूषण', 'नायिका-भेद', 'नखशिख', 'सातसतक' हे चार ग्रंथ लिहिले.
प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मोठी फौज घेऊन दक्षिणेत आला.
छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच मराठ्यांचा मुघलांशी सतत संघर्ष सुरू होता.
महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी स्वराज्य सांभाळले.
याच काळात सत्तासंघर्षाच्या कारणास्तव औरंगजेबाचा मुलगा अकबर याने संभाजी महाराजांशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण केले.
त्याला शासन करण्याकरता आणि मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्याकरिता औरंगजेब स्वतः प्रचंड सैन्य व अनुभवी सरदारांना घेऊन दक्षिणेत आला.
पंचवीस वर्ष त्याने महाराष्ट्रात तळ ठोकून मराठ्यांशी युद्ध केले, परंतु तो स्वराज्य नष्ट करू शकला नाही.
मुघलांचे दख्खनवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे धोरण अकबरापासूनच होते.
औरंगजेबाला ही दक्षिणेतील विजापुर व गोवळकोंडा ही मुस्लीम राज्य जिंकायचे होते.
मराठा राज्य त्याला नष्ट करायचे होते.
छत्रपती राजाराम महाराज -
प्रश्न - महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असा निर्णय घेण्यात आला. (सकारण स्पष्ट करा.)
छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी रायगडावर सत्तेची सूत्रे हाती घेतली.
औरंगजेबाने रायगडाला वेढा घालण्यासाठी झुल्फिकारखानास पाठवले.
त्याने गडाला वेढा दिला, तेव्हा गडावर छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व राजपुत्र शाहू हे होते. छत्रपतींच्या घराण्यातील सर्व राजकुटुंबाने एकाच वेळी एकाच गडावर राहणे धोक्याचे होते.
छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला जायचे आणि महाराणी येसूबाईंनी रायगड किल्ला लढवायचा, असे ठरले.
१६८९ रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. येसूबाई आणि राजपुत्र शाहू यांना कैद करून दिल्लीला पाठवण्यात आले.
महाराणी येसूबाई पुढे ३० वर्ष मोगलांच्या कैदेत होत्या.
छत्रपती राजाराम महाराज -. टिपा लिहा.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवरायांचे दुसरे पुत्र राजाराम छत्रपती झाले.
झुल्फीकारखानाने रायगडाला वेढा दिला व राजाराम महाराज यांनी तामिळनाडूतील किल्ल्यावरुन मुघलांच्या ताब्यातील खानदेश, वर्हाड, बागलाण या प्रदेशांवर हल्ले केले.
२ मार्च १७०० रोजी त्यांचे सिंहगडावर निधन झाले.
महाराणी ताराबाई -
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर (मार्च १७००) त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा लढा पुढे चालवला.
मुघल शत्रूंविरुद्ध प्रथम छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि पुढे महाराणी ताराबाईंनी लढा दिला.
या सोनेरी पर्वाला ''मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध" असे म्हणतात.
राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांनी आपले वैधव्याचे दुःख बाजूला ठेवून मराठी सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली.
उत्तम राज्यकारभार, लष्करी मोहिमांचे संयोजन, राज्यातील सेनानी अधिकार्यांवर देखरेख व वचक याबाबतीत ताराबाईंनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
ताराबाईंनी आपल्या सरदारांना महाराष्ट्राबाहेर पाठवून स्वराज्याचा विस्तार केला.
गनिमी काव्याचा उपयोग करून त्यांनी औरंगजेबास जिकिरीस आणले.
ताराबाईने स्वतः अनेक मोहिमांमध्ये सैन्याचे नेतृत्व केले.
अनेक सरदारांना स्वराज्य कार्याला जोडले.
महाराणी ताराबाई अत्यंत बुद्धिमान आणि कार्यशील होत्या.
राजाराम महाराजांच्या काळात सैन्याची व्यवस्था व राज्यकारभार हाती घेऊन कीर्ती मिळवली होती.
त्यांच्या कर्तबगारीमुळे मराठ्यांचे राज्य जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण झाले नाही.
शिवकालीन राज्यव्यवस्था -
स्वराज्य स्थापनेनंतर स्वराज्य विस्तारून महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा,सांगली,कोल्हापूर,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथील प्रदेश तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव, कारवार, धारवाड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू राज्यातील जिंजी व वेल्लोर आणि आसपासचा बराचसा भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता.
स्वराज्याचा कारभार व्यवस्थित पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था राबवली होती.
अष्टप्रधान मंडळ :-
प्रश्न - शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळाची माहिती लिहा.
स्वराज्याचा कारभार सुव्यवस्थित राहण्यासाठी राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली.
त्या अंतर्गत अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली.
अष्टप्रधानांकडे विशिष्ट खात्यांची जबाबदारी सोपवली.
अष्टप्रधान मंडळात अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, सुमंत, न्यायाधीश व पंडितराव यांचा समावेश होता.
हे मंत्री जेव्हा स्वारीवर जात, तेव्हा त्यांचे मुतालिक म्हणजेच प्रतिनिधी त्यांचा कारभार पाहत असत.
अष्टप्रधान यांच्या कचेरीच्या दैनंदिन कामासाठी दिवाण, मुजुमदार, फडणीस,सबनीस, कारखानीस, चिटणीस, जामदार (खजिनदार)व पोतदार (नाणे तज्ञ) हे दरकदार (अधिकारी) नेमले होते.
स्वराज्याचे प्रांतीय प्रशासन :-
प्रश्न - स्वराज्याच्या प्रांतीय प्रशासनाची माहिती लिहा.
राज्याचे दोन विभाग केले गेले.
१. एक सलग असणाऱ्या प्रदेशाचा आणि २. दुसरा विखुरलेल्या दक्षिणेकडील प्रदेशाचा.
१. पहिल्या मुलुखाची तीन भागात विभागणी करण्यात आली.
१.१) पेशव्यांकडे उत्तरेकडील प्रदेश होता-त्यामध्ये साल्हेरपासुन पुण्यापर्यंतचा वरघाट व उत्तर कोकणाचा समावेश होता.
१.२) मध्य विभाग सचिवांकडे सोपवण्यात आला होता - त्यामध्ये दक्षिण कोकण, सावंतवाडी व कारवार हा भाग होता.
१.३) तिसऱ्या भागात पूर्वेकडील प्रदेश मंत्र्यांकडे सोपवण्यात आला होता- यामध्ये पूर्वेकडील वरघाटाचा प्रदेश म्हणजेच सातारा-वाई ते बेळगाव आणि कोप्पळपर्यंतचा प्रदेश होता.
कर्नाटकच्या स्वतंत्र सुभ्याची जबाबदारी सेनापती हंबीरराव मोहिते व अमात्य रघुनाथ नारायण यांच्याकडे सोपवली.
या सर्व विभागांवर महाराज, सरसुभेदार व राज्य मंडळाचे नियंत्रण असे.
किल्लेदार व कारकून वर्गाची नेमणूक स्वतः महाराज करत.
दरवर्षी प्रधानांनी महाराजांना विषय सादर करायचा, अशी व्यवस्था असे.
विभागीय कारभारात सरसुभेदार मदत करत. त्यांना देशाधिकारी म्हणत.
मुसलमानी राजवट व शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था यातील मुख्य फरक म्हणजे सरसुभे महसुली विभाग नसून कारभार व्यवस्थेसाठीच केले गेले.
त्यामुळे सुभेदार मनमानी करू शकत नसत.
सुभेदाराला सरकारी कर वसुलीचे कामी प्रजेचे परंपरागत अधिकारी, परगण्याचे देशमुख व देशपांडे यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते.
जमिनीची लागवड व वसाहत करवून सरकारचा सारा गोळा करणे, हे देशमुखाचे मुख्य काम असे.
सर्व सरकारी अधिकाऱ्यांना वतन न मिळता वेतन दिले जात होते.
गाव हे राज्यव्यवस्थेत महत्त्वाचे घटक होते. नवीन गावे वसवली जाऊ लागली.
तेथील रयतेला कसण्यास गुरेढोरे, बीजासाठी दाना-पैका, उदरनिर्वाहासाठी दाणा-पैका देण्यात येई.
तो ऐवज दोन वर्षांनी जेव्हा पीक येई, तेव्हा कापून घेतला जाई. या पद्धतीला 'तगाई पद्धत' म्हटले गेले.
शिवशाही धारापद्धत - शिवकाठी :-
जमिनीची धारा म्हणजेच जमिनीची प्रत.
शिवाजी महाराजांनी जमीनीचे मोजमाप ठरवण्यासाठी काठीचे माफ ठरवले.
पाच हात व पाच मुठी मिळून एक काठी. वीस काठ्यांच्या औरस चौरसांचा (लांबी-रुंदी) एक बिघा.
१२० बिघ्यांचा एक 'चावर' असे जमिनीचे मोजमाप ठरवले.
अण्णाजी दत्तो (सचिव) यांनी गावोगावी जाऊन जमिनीच्या संबंधातील जमिनीचा 'धारा', चावराणा', प्रतबंदी इत्यादी बाबी लावणीवरून ठरवल्या.
चावराणा म्हणजे जमीन मोजून तिच्या सीमा ठरवणे.
डोंगरी जमिनीच्या साऱ्याची आकारणी बिघ्यावर न करता नांगरावर होई.
शेतसारा आकारणीत जमिनीच्या कसाबरोबर पिकाची प्रतही पाहण्यात येई.
आकार (सारा) ठरवतांना तीन वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी घेऊन मगच सारा ठरवण्यात येई.
वाजट (म्हणजे पडीक) जमीन, जंगल, कुरण इ. गावची जमीन शेतसाऱ्यासाठी विचारात घेतली जात नसे.
शाहू महाराजांची सुटका-
छत्रपती शाहू -महाराणी ताराबाई यांच्यातील यादवी -
मराठा स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात संभाजी महाराजांची पत्नी राणी येसूबाई व पुत्र शाहू औरंगजेबाच्या कैदेत होते.
औरंगजेबाच्या मृत्यूमुळे मराठा स्वातंत्र्य संग्रामाचा शेवट झाला.
मराठ्यांमध्ये दुही निर्माण करण्यासाठी ८ मे १७०७ रोजी शाहूंची कैदेतून सुटका केली.
शाहू महाराष्ट्रात आले. महाराणी ताराबाईंनी शाहूंचा गादीवरील हक्क नाकारला.
भीमा नदीच्या काठी खेड येथे युद्ध होऊन शाहूच्या पक्षाचा विजय झाला.
शाहू महाराजांच्या पक्षात महत्त्वाची कामगिरी बजावणारे बाळाजी विश्वनाथ यांची पेशवेपदावर नेमणूक झाली. तेव्हापासून पेशवेकाळ सुरु झालेला दिसून येतो.
छत्रपती शाहूंनी सातारा येथे स्वतःचा राज्याभिषेक केला.
त्यामुळे महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे मराठ्यांच्या दुसऱ्या गादीची स्थापना केली.
सातारा आणि कोल्हापूर या दोन राज्यांमधील संघर्ष वारणेचा तहाने संपला.
त्यामुळे मराठ्यांच्या यादवीची समाप्ती झाली.
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध हे 'लोकयुद्ध' होते.
त्यात सर्व जाती जमातीच्या लोकांचे मोलाचे योगदान होते.
पेशवेकाळ-
बाळाजी विश्वनाथ भट - स्वराज्याचा पहिला पेशवा.
मराठ्यांच्या यादवीच्या काळात बाळाजी विश्वनाथाने छत्रपती शाहूंना अत्यंत प्रामाणिकपणे व विश्वासाने मदत केली.
याची जाणीव शाहू महाराजांनी ठेवून बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद दिले.
बाळाजी विश्वनाथांनी शाहू विरोधकांवर मात केली.
कान्होजी आंग्रेंसारख्या मातब्बर सरदाराला छत्रपती शाहूंच्या पक्षात आणले.
दिल्लीच्या बादशहाकडून चौथाई, सरदेशमुखी इ. सनदा प्राप्त केल्या.
बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर शाहूंनी त्यांचा मुलगा बाजीराव यास पेशवेपद दिले.
त्यामुळे भट घराण्याकडे वंशपरंपरेने पेशवाई सुरू झाली.
पेशवा पहिला बाजीराव -
मराठी सत्तेचा आर्थिक प्रश्न सोडवणे आणि दूरवरच्या प्रदेशात साम्राज्यविस्तार करण्याच्या हेतूने बाजीरावाने उत्तरेकडे विस्तारवादी धोरणाचा स्वीकार केला.
त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्याचा विस्तार माळवा, राजस्थान आणि बुंदेलखंडामध्ये झाला.
दक्षिणेत निजाम, सिद्दी, पोर्तुगीज इत्यादी शत्रूंवर वचक निर्माण केला.
कर्तुत्ववान व्यक्तींना संधी दिली. त्यामुळे मराठा सरदारांनी पंजाब जिंकून अटकेपार मराठी झेंडा फडकवला.
बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे -
नानासाहेबांनी आपले लक्ष दक्षिणेकडे केंद्रित केले.
बंगाल प्रांतावरून भोसले, निजाम, सिद्दी यांच्याशी संघर्ष निर्माण झाले.
या काळात इंग्रजांनी बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला.
आंग्रे यांच्या आरमारातील मराठी सत्ता सामर्थ्यशाली आहे, हे ओळखून इंग्रजांनी कुटनीतीचा वापर करून मराठ्यांच्या मदतीने आंग्रे यांचे आरमार नष्ट केले.
नानासाहेबांच्या उत्तर धोरणातून १७६१ मध्ये तिसरे पानिपतचे युद्ध घडून आले.
या युद्धातील पराभवामुळे मराठे आणि मराठी सत्ता दुबळी झाली.
मराठी सत्तेची घडी पुन्हा एकदा बसवण्याचा प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केला.
माधवराव पेशवे -
पेशव्यांच्या मालिकेतील सर्वश्रेष्ठ पेशवा म्हणून इतिहासकारांनी पहिल्या माधवराव पेशव्यांचा उल्लेख केला आहे.
पानिपतचा पराभव हा केवळ राजकीय पराभव नसून त्याचा मोठा परिणाम मराठ्यांच्या मानसिकतेवर देखील झालेला होता.
मराठ्यांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करण्याचे तसेच उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न माधवरावांनी केले.
निजाम, हैदर यासारख्या शत्रूंचा पराभव केला.
स्वार्थी मराठा सरदार वठणीवर आणले. आग्रा, दिल्ली, पंजाबवर वर्चस्व स्थापन केले.
नजीबखान रोहिल्याचा पराभव केला.
शहाआलमला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवले.
संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा दरारा निर्माण केला.
पानिपत युद्धामुळे मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा माधवरावांनी पुन्हा प्राप्त केली.
मराठे अजून जिवंत व सामर्थ्यशाली आहेत, हे दाखवून दिले.
ही बाब अत्यंत महत्त्वाची होती. यामध्ये मल्हाराव होळकर, अहिल्याबाई होळकर, रघुजी भोसले, महादजी शिंदे, नाना फडणीस यांचा मोलाचा वाटा आहे.
पहिल्या माधवराव पेशवेंविषयी इतिहासकार ग्रॅंड डफ म्हणतो की, "पानिपतचे मैदान मराठ्यांना जेवढे घातक ठरले नाही त्यापेक्षा ही अधिक घातक माधवरावांचा अकाली मृत्यू ठरला".
अफगाणिस्तानातून आलेले पठान हिमालयाच्या पायथ्याशी अयोध्येजवळ स्थायिक झाले होते.
या पठाणांना रोहिले म्हणत. रोहिलखंड ह्या नावाने हा प्रदेश ओळखला जातो.
नजीबखान हा रोहिल्यांचा सरदार होता.
उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला मान्य नव्हते.
नजीबखानाने अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशह अब्दाली याला भारतात येण्यास निमंत्रित केले.
त्याच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर स्वारी केली.
प्रचंड प्रमाणात लूट करून तो परतला. परंतु मराठ्यांनी त्याच्या सैन्याचा अटकेपर्यंत पाठलाग केला.
अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला.अटक हे सध्या पाकिस्तानात आहे.
मल्हारराव होळकर -
मल्हारराव हे इंदौरच्या घराण्याचे संस्थापक होते.
त्यांनी दीर्घकाळ मराठी राज्याची सेवा केली.
पानिपतच्या युद्धानंतर उत्तरेत मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
गनिमी काव्याच्या युद्धात निपुण असणाऱ्या मल्हाररावांनी पहिले बाजीराव, नानासाहेब व माधवराव पेशव्यांच्या काळात उत्तरेत मोठा पराक्रम गाजवला.
मराठ्यांचे माळव्यात आणि राजपुतान्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मल्हाररावांचा मोठा वाटा होता.
अहिल्याबाई होळकर -
पानिपतच्या युद्धात मल्हारराव होळकर यांचा पुत्र खंडेराव धारातीर्थी पडला.
मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर इंदौरच्या कारभाराची जबाबदारी अहिल्याबाई होळकर यांनी पार पाडली.
अहिल्याबाईनी महापराक्रमी सेनानी व सासरे मल्हारराव होळकर यांचा वारसा जपला.
कुंभेरीच्या लढ्यात अहिल्यादेवींचे पती खंडेराव धारातीर्थी पडले आणि ऐन तारुण्यात त्यांच्यावर वैधव्य कोसळले.
मल्हाररावांनी त्यांना धीर देत राजकारण आणि समाजकारणातील बारकावे समजावून सांगितले.
त्यामुळे मल्हाररावांच्या गैरहजेरीत त्या सक्षमपणे कारभार पाहू लागल्या.
अद्भुत, सहज आणि रणकौशल्य दाखवून त्यांनी सर्व कार्यात यश मिळवले.
त्यांना अन्यायाची चीड होती. होळकर राज्यात त्यांनी नियमबद्ध न्यायालयाची मुहूर्तमेढ रोवली.
इंदौरच्या कारभाराची सूत्र स्वीकारलेल्या अहिल्याबाई होळकरांनी जनहिताची पुढील कामे केली --
१. नवे कायदे करून शेतसारा, कर वसुली.
२. शेतकऱ्यांना विहिरी खोदून देऊन पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या.
३. तलाव, तळे निर्माण केले.
४. व्यापार, उद्योगाला प्रोत्साहन दिले.
५. महत्त्वाच्या धर्मस्थळांवर मंदिरे,घाट, धर्मशाळा यांची उभारणी केली.
६. राज्यात शांतता, सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले.
खाजगी जीवनात अत्यंत दयाळू व क्षमाशील असलेल्या अहिल्याबाई न्याय देताना कठोर होऊन निःपक्षपातीपणे वागत.
अंतिम न्यायनिवाडा त्या स्वतः करत.
अहिल्याबाई ह्या मुत्सद्दी, उत्कृष्ट प्रशासक,ग्रंथप्रेमी व दानशूर होत्या.
त्यांच्यामुळे देशात सांस्कृतिक ऐक्य निर्माण होण्यास मदत झाली.
अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मृत्यू महेश्वर येथे इ.स.१७९५ मध्ये झाला.
रघुजी भोसले -
नागपूरकर भोसल्यांपैकी रघुजी भोसले सर्वांत कर्तबगार होते.
त्यांनी पूर्व भारतात बंगालपर्यंत मराठी सत्तेचा दरारा निर्माण केला.
महादजी शिंदे -
पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न महादजी शिंदे यांनी केले.
त्यांनी लष्करी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि तोफखाना सुसज्ज केला.
महादजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून १७७१ ते १७९४ या काळात दिल्लीचा कारभार सक्षमपणे पाहिला.
माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी बसवली.
नारायणराव पेशवे -
पेशवा माधवरावांनंतर राघोबादादांना पेशवेपद हवे होते, परंतु ते नारायणरावांना मिळाले.
गादीवर आलेले नारायणराव आणि सवाई माधवराव हे दोन्ही पेशवे अल्पायुषी ठरले.
त्यानंतर मात्र मराठ्यांच्या सत्तेचा ऱ्हास सुरु झाला.
या सुमारास मोगलांची सत्ता देखील दुबळी झालेली होती.
नारायणरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा सवाई माधवराव पेशवे झाले.
मात्र राज्यकारभार धोरणी लोकांच्या हाती आला, त्यांना 'बारभाई' असे म्हणत.
सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर राघोबादादांचे पुत्र दुसरा बाजीराव पेशवे झाले, पण ते कार्यक्षम नसल्याने राज्यकारभाराची घडी विस्कटली.
त्याचा फायदा इंग्रजांनी घेऊन एक-एक बलशाली मराठा सरदारांचा पराभव केला.
महाराष्ट्रावर इंग्रजी सत्तेचे वर्चस्व निर्माण झाले.
कला, स्थापत्य, साहित्य -
कला :-
सचित्र हस्तलिखित पोथ्या,पटचित्रे व चित्रित पत्रिका,लघुचित्रे आणि काचचित्रे या विविध स्वरूपात मराठी चित्रकलेचा आविष्कार झालेला आढळतो.
'भगवतगीता', 'सप्तशती', 'भागवतपुराण' अशा काही संस्कृत आणि 'ज्ञानेश्वरी', 'शिवलीलामृत', 'पांडवप्रताप' अशा काही मराठी ग्रंथांची सचित्र हस्तलिखिते उपलब्ध आहेत.
त्यातून दशावताराची चित्रे आढळतात. पोथ्यांच्या फळ्यांवर गणपती, रिद्धी-सिद्धी, रामपंचायतन, गोपालकृष्ण, विष्णूलक्ष्मी यांची चित्रे गडद अशा लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगांनी चित्रित केले आहेत.
लघुचित्रांमध्ये व्यक्तीचित्रे, रागमाला, तालमाला, मिरवणुकी इत्यादी प्रसंगांची चित्रे आहेत.
थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, पिलाजी जाधव यांची उत्कृष्ट व्यक्तिचित्रे उपलब्ध आहेत.
चित्रकाम बहुदा वाड्यांच्या दर्शनी भागावर तसेच दिवाणखान्याच्याव शयनगृहांच्या भिंतींवर आडळून येते. देवालयात मंडपाच्या भिंती, शिखरे, गाभार्याच्या भिंती आणि छत हे सुद्धा चित्रकामाने सुशोभित केलेली दिसतात.
प्रश्न- चुकीची जोडी करून लिहा.
वाठारचा - नाईक निंबाळकरांचा वाडा.
मेणवली - नाना फडणवीसांचा वाडा.
नेवासे - मोहिनीराज मंदिर.
चांदवडचा- रंगमहाल.
मोरगाव - मयुरेश्वर मंदिर.
पांडेश्वरचे - शिवमंदिर.
बेनवडीचा मठ. अशा काही ठिकाणी अद्यापही १८ व्या शतकातील भित्तिचित्रे आहेत.
या भित्तिचित्रांचे विषय मुख्यतः पौराणिक आहेत.
त्यात रामायण, महाभारत आणि पुराणे यातील प्रसंग आहेत.
दशावतार आणि कृष्णलीला यांची चित्रे सर्वत्र आढळतात.
तत्कालीन सामाजिक जीवनातील प्रसंग हे लोकप्रिय होते.
राजसभा, राजपुरुषांची भेट, मिरवणूकी यांचा यात समावेश होतो.
मराठी अमलात मुख्यतः भजन, कीर्तन होई.
वीरवृत्ती निर्माण करणारे पोवाडे, वांॾमय तयार झाले.
ऐतिहासिक काव्य शाहिरांच्या पोवाड्यातून व कटावातून निर्माण झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 'अज्ञानदास' याने अफजलखान वधाविषयी रचलेला आणि 'तुलसीदासांनी' सिंहगडच्या लढाईचा रचलेला पोवाडा प्रसिद्ध आहे.
पेशवेकाळात पोवाडा, लावणी, तमाशा हे मनोरंजनाचे प्रकार अत्यंत लोकप्रिय होते.
त्यातूनच संगीताचे संवर्धन झाल्याचे दिसून येते.
पुण्यातील पेशवे दरबारामध्ये नर्तकी, गायक-वादक आपली कला सादर करत असत.
लोक सण समारंभ, उत्सवाच्या वेळी संगीताचा आनंद घेत असत.
पेशवेकाळात श्रीधर, मोरोपंत यांसारखे श्रेष्ठ ग्रंथकार तर होनाजी बाळा, सगनभाऊ,परशुराम इत्यादी श्रेष्ठ शाहीर होऊन गेले.
उत्तर पेशवाईत लावणी वाॾमयाला बहर आला.
या क्षेत्रात अनंतफंदी, प्रभाकर, रामजोशी, सगनभाऊ होनाजी बाळा यांनी मोठा लौकिक मिळवला.
मराठेशाहीत लावणीनृत्य, कोळीनृत्य, गजनृत्य, वाघ्या-मुरळीची नृत्य, वासुदेवाचे नृत्य यांची जोपासना झाली.
संगीत कलेचीही उपासना केली गेली.
स्थापत्य -
'लेणे' स्थापत्यासाठी महाराष्ट्र जसा प्रसिद्ध आहे. तसाच दुर्गस्थापत्याकरिता सुप्रसिद्ध आहे.
सतराव्या शतकापर्यंत दुर्गस्थापत्याला अनन्यसाधारण महत्त्व होते.
शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्याला प्राधान्य दिले.
दख्खनमध्ये तीन शतके किल्ल्यांची रचना झाली होती.
त्याचा उपयोग महाराजांना झाला. त्यांच्या पदरी या विषयातील जाणकार देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापत्यशास्त्राचे चांगले ज्ञान होते.
हिरोजी इंदुलकर, आबाजी सोनदेव, मोरोपंत पिंगळे या स्थापत्यविशारद तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यांची निर्मिती झाली.
पश्चिम किनाऱ्यावरील सागरी कोकणपट्टी सुरक्षित राखण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग बांधले.
किल्ले बांधताना प्रवेशद्वाराच्या तटबंदीना संरक्षणाच्या दृष्टीने खास तंत्राने बांधले.
शिवाजी महाराजांनी जलदुर्ग,भूदुर्ग व गड बांधले.
मराठा काळातील मंदिर स्थापत्यामध्ये हेमाडपंती शैलीची, राजस्थानी शैलीची, मराठा शैलीची मंदिरे उभारण्यात आली.
पुण्यातील कसबा मंदिर, विठ्ठलवाडीचा विठोबा या मंदिरांचा जीर्णोद्धार राजमाता जिजाबाई यांनी केला आहे.
सर्व प्रकारच्या कलाशिल्पाला नवचैतन्य प्राप्त झाले.
सातारा, नाशिक या शहरांची वाढ झाली.
सगळीकडे फरसबंदी रस्ते, दुतर्फा झाडे मधूनच कमानदार विशेष असे चित्र दिसू लागले.
उत्तर पेशवाईत मंदिर बांधणीला मोठ्या प्रमाणावर आरंभ झाला.
ही मंदिरे तीन प्रकारचे आहेत
यादवकालीन घाटाची मंदिरे, सासवड (वटेश्वर संगमेश्वर), माहुली (विश्वेश्वर), जेजुरी या ठिकाणी दिसतात.
ती आकाराने मोठी असत. त्या मंदिराचे विधान तारकाकृती असे.
मंदिराचे जोते अनेक थरांनी बांधले जात होते. त्याला विविध नावे असत.
शिखरांचे बांधकाम विटांचे असे आणि ते चुनेगच्ची पद्धतीने केलेले असे.
नाशिकचे काळाराम, गोराराम, सुंदरनारायण मंदिर आणि त्र्यंबकेश्वर येथील महादेवाचे मंदिर तसेच नेवाशाची मोहिनीराज मंदिर ही मंदिरे माळवा, राजस्थानमधील मंदिरासारखी आहेत.
या मंदिरांची संपूर्ण बांधणी दगडी होती. या मंदिरांमध्ये इतर प्रकारच्या मंदिरांपेक्षा कोरीवकाम अधिक आहे.
तिसऱ्या प्रकारात पुणे, सातारा, वाई या सारख्या ठिकाणांच्या मंदिरांची बांधणी खास पद्धतीची होती.
या पद्धतीच्या वैशिष्ट्यांमध्ये चौकोनी गाभारा,कमानींची व त्यासमोर लाकडी सभामंडप, गाभारा यांचा समावेश होतो.
शिखर टप्प्याटप्प्याने निमुळते होत जाते.
शिखरांवर लहान कोनाड्यात चुनेगच्चीमध्ये मूर्तीकाम केलेले असून मूर्ती सुबक, उठावदार असत. यामध्ये दशावतार, देवदेवतांच्या मूर्ती, स्त्रिया आणि पुरूष यांच्या मूर्ती आहेत.
दगडी दीपमाळा हे मंदिरांचे खास वैशिष्ट्य आहे.
'जेजुरी' येथील दिपमाळा शहाजी राजांनी बांधलेल्या आहेत.
बहुतेक गावे व मंदिरे नद्यांच्या काठी असल्याने मंदिरांच्या समोरच्या नदीतीरावर दगडी घाटही बांधण्यात आले.
नाशिक, पुणतांबे, वाई, मेनवली, माहुली इत्यादी ठिकाणी असे विस्तीर्ण घाट दिसतात.
अनेक ठिकाणी बांधलेल्या छत्र्या (समाधी) लक्षणीय आहेत.
साहित्य -
या काळात मराठी साहित्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला.
मराठा काळात वीरव्रुत्ती निर्माण करणारे पोवाडे लिहिले गेले.
हे ऐतिहासिक काव्य शाहिरांच्या पोवाड्यातील व कटावांंतून निर्माण झाले.
अज्ञानदास याने लिहिलेला अफजलखानचा वधविषयक पोवाडा व तुळसीदास याने लिहिलेला सिंहगडच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहेत.
समकालीन संत तुकाराम वारकरी संप्रदायातील प्रमुख आध्यात्मिक कवी होते.
त्यांनी रचलेल्या अभंगामुळे समाजावर मोठा प्रभाव पडला.
समर्थ रामदासांनी मराठीमध्ये दासबोध आणि मनाचे श्लोक लिहिले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी फारशी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा 'राज्यव्यवहारकोश' तयार करून घेतला.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकारही होते.
छत्रपती संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ लिहिला.
राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचे सार संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथांमध्ये मांडले.
संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या.
नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ त्यांनी लिहिले.
महम्मद कासिम फेरिस्ता याने १२ खंडात 'गुलशने इब्राहिमी' हिंदुस्थानचा इतिहास लिहिला.
१८ व्या शतकात वामन पंडित यांनी यथार्थदीपिका, रघुनाथ पंडित यांनी नलदमयंती स्वयंवर,श्रीधर नार्वेकर यांनी पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय, मोरोपंत यांनी अनुवाद केलेला महाभारत यासारख्या अनेक सुप्रसिद्ध साहित्यकृती निर्माण झाल्या.
जुन्या मराठी ऐतिहासिक साहित्यातील ग्रंथांमध्ये बखर साहित्य महत्त्वपूर्ण आहे.
ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचायला मिळते.
सभासद बखर,भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, पेशवेकाळात कृष्ण दयार्णव आणि श्रीधर हे प्रमुख कवी होते.
महिपतीचा 'भक्तीविजय' ग्रंथ याच काळातील आहे.
उत्तर पेशवाईत लावणी वाॾमयाला बहर आला.
अनंत फंदी, प्रभाकर, रामजोशी, सगनभाऊ व होनाजी बाळा यांना लावणी काव्याद्वारा मोठा लौकिक मिळाला.
व्यापार-उद्योग व समाजजीवन -
मराठाकालीन व्यापार-उदीम -
राज्याची आर्थिक भरभराट व्यापार -उदीमावर अवलंबून असते, याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना होती.
त्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी व्यापारीपेठा स्थापन केल्या.
व्यापाऱ्यांना व उद्योजकांना प्रोत्साहन दिले होते.
शेतीवर महाजन वतनी अधिकारी नेमले जात असून राजापूर, रत्नागिरी या काळातील काही महत्त्वाची बंदरे व्यापारी उलाढालीची केंद्रे होती.
चौल, राजापूर, दाभोळ, केळशी, रत्नागिरी या बंदरातून विविध वस्तूंची परदेशात निर्यात होत असे.
स्वराज्यातील उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर मोठी जकात आकारली जात असे.
व्यापारउदिमामुळे पुणे,इंदापूर, सासवड, जुन्नर, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला, सातारा, पैठण,कोल्हापूर, अहमदनगर आणि कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील अनेक गावांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली.
दाभोळ येथून मिरे, लाख व जाडेभरडे कापड निर्यात केले जाई.
चौल येथून रेशमी कापड,अफू व नीळ या वस्तू निर्यात केल्या जात.
राजापूर येथून मिरी, वेलदोडे, सुती कापड यांचा व्यापार होत असे.
राजापूर येथून माल भरून परदेशी व्यापाऱ्यांची जहाजे तांबडा समुद्र व इराणच्या आखाताकडे जात असत.
स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे शिवाजी महाराजांचे धोरण होते.
महाराजांनी कोकणातील मिठ उद्योगाला संरक्षण दिले.
पोर्तुगीज प्रदेशातून स्वराज्यात मोठ्या प्रमाणात मीठ आयात होत असल्याने स्वराज्यातील उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत गेला.
कोकणातून उत्पादित होणाऱ्या मीठ उद्योगाला संरक्षण मिळावे, म्हणून शिवरायांनी स्वराज्यात येणाऱ्या पोर्तुगिजांच्या मीठावर मोठी जकात बसवली.
त्यामुळे त्याच्या आयातीत घट झाली. स्थानिक मिठाची विक्री वाढली.
अशाप्रकारे स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याची धोरणे यातून दिसून येतात.
मराठाकालीन समाजजीवन -
मराठा कालखंडात बहुतांश लोक खेड्यात राहत होते.
खेड्यांमध्ये दोन विभाग होते.
१. गावाच्या लोकवस्तीच्या विभागाला 'पांढरी' असे म्हणत.
२. तर लागवडीखाली असलेल्या शेतीस 'काळी' किंवा 'काळीआई' असे म्हणत.
'गाव' स्वराज्यातील एक महत्त्वाचा घटक होता.
गाव संपूर्ण बाबतीत स्वयंपूर्ण असे.
प्रत्येक खेड्यात बारा बलुतेदार असत.
मराठा कालखंडामध्ये गावात विकासासाठी व स्थैर्यासाठी बलुतेदारांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
त्यांचे व्यवसाय वंशपरंपरेने ठरलेले असत.
बलुतेदारी पद्धतीमधील प्रत्येक व्यक्तीस समाजात निश्चित असे स्थान असताना ते सोनार, लोहार, तांबट इत्यादी.
बलुतेदार आपापले व्यवसाय सांभाळत असत.
मोठ्या खेड्यात आठवड्याचा बाजार भरवला जात असे.
अशा खेडे लोकसभा असे म्हटले जाई. त्यात लोक दैनंदिन गरजेच्या लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी येत असत.
कापड उद्योग, धातुकाम, साखर उद्योग असे काही उद्योग अस्तित्वात होते.
तत्कालीन महाराष्ट्रातील समाजात सरदार, वतनदार, बलुतेदार आणि रयत असे वर्ग होते.
ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची संख्या अधिक होती.
महाराष्ट्रात वाई, नाशिक, पैठण इत्यादी ठिकाणी पाठशाळा चालवल्या जात असत.
समाजामध्ये पारंपरिक उत्सव, व्रतवैकल्ये असे सण-उत्सव साजरे केले जात.
सण-उत्सवांना राज्यव्यवस्थेकडून देखील प्रोत्साहन मिळत असे.
कारण अशा प्रकारच्या सामाजिक उत्सवांमुळे लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होत असे व ऐक्याचे वातावरण निर्माण होत असे.
मराठेकालीन शहरीकरण -
राजकीय विस्तार आणि व्यापारी हालचाली यातून मराठी राज्यात शहरांचा विकास झाला.
असे दिसून येते की, व्यापार - व्यवसायाच्या निमित्ताने अनेक शहरे उदयाला आली.
पेशवेकाळात शहरीकरणाचे प्रमाण अधिक वाढले.
पेशव्यांनी पुणे ही आपली राजधानी केल्यामुळे पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला.
बाजारपेठांची संख्या वाढली.
इंदापूर, सासवड, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर इ.
तसेच कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील अनेक लहान-मोठी बंदरे व्यापार उद्योगाच्या निमित्ताने भरभराटीला आलेली होती.
मराठ्यांच्या स्वराज्य स्थापनेपासून ते साम्राज्यविस्तारापर्यंतचा प्रवास हा मध्ययुगीन भारतातील महत्त्वाचा घटक आहे.
मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली व इंग्रजांनी बहुतांश भारत आपल्या आधिपत्याखाली आणला.
अनेक क्षेत्रांत स्थित्यंतरे घडून आली.
आधुनिक कालखंडात भारताची वाटचाल सुरू झाली.
ऐतिहासिक व्यक्ती,ठिकाणे व घटनांची नावे-
१. स्वराज्याचा जमाखर्च ठेवणारा- अमात्य.
२. विभागीय कारभारात मदत करणारा- सरसुभेदार.
३. रोहिल्यांचा सरदार- नजीबखान
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा