प्रकरण- ८ मौर्यकालीन भारत
प्रस्तावना-
भारतात अस्तित्वात असलेल्या सोळा महाजनपदांचा इतिहास आपण बघितला.
या महाजनपदांपैकी काशी, कोसल,अवंती आणि मगध यांच्यात महाजनपदांमधील संघर्षांमध्ये मगधची राजसत्ता प्रबळ होत गेली आणि मगधाचे साम्राज्य उदयाला आले.
पर्शियन आणि ग्रीकांच्या आक्रमणाचा परिणाम म्हणून भारतात प्रबळ साम्राज्याची आवश्यकता भासू लागली.
तसे पाहिले तर इसवी सन पूर्व ६ व्या शतकापासूनच मगध साम्राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती.
या प्रक्रियेतूनच नंद साम्राज्य आकाराला आले. हेच भारतातील पहिले प्रबळ साम्राज्य होय.
मगध साम्राज्याचा उदय-
प्रश्न- मगध हे बलवान महाजनपद होते. (सकारण स्पष्ट करा)
प्राचीन भारताची महाजनपदे होती, त्यामध्ये मगत हे एक महत्त्वाचे राज्य होते. कारण-
1. मगध महाजनपदातील जमीन सुपीक व समृद्ध होती.
2. बाराही महिने वाहणाऱ्या नद्यामुळे नौकानयनाची उत्कृष्ट सोय होती.
३. आर्थिक उत्कर्षासाठी व्यापारी बाजारपेठांची उपलब्धता होती.
इत्यादी कारणांमुळे मगध राज्य बलवान होत गेले.
हर्यंक घराणे-
इसवी सन पूर्व ६ व्या शतकात मगधावर हर्यंक नावाच्या राजघराण्याची सत्ता होती. महाभारतात हर्यंक घराण्याचा उल्लेख येतो.
हर्यंक घराण्यातील बिंबीसार हा पहिला प्रसिद्ध राजा होता.
त्याचे वडील 'महापद्म' यांनी गिरिव्रज हा दुर्ग बांधून मगधची पहिली राजधानी स्थापन केली.
प्रश्न- बिंबिसाराने मगध साम्राज्याचा पाया कसा रचला? (थोडक्यात उत्तरे लिहा)
स्वराज्याचा पाया बिंबिसाराने रचला.बिंबिसाराने शेजारचे अंग राज्य जिंकून घेतले. तसेच बिंबिसाराने कोसल, लिच्छवी, विदेह आणि मद्र अशा अनेक राजघराण्यांशी वैवाहिक संबंध सोडून त्याच जोरावर आपले विस्तारवादी धोरण पुढे नेले.
गिरीदुर्गच्या पायथ्याशी त्याने राजगृह ही नवी राजधानी स्थापन केली.
प्रश्न- अजातशत्रूचा कारकिर्दीचे वर्णन करा. ( थोडक्यात उत्तर लिहा)
बिंबिसार या आपल्या पित्याची हत्या करून अजातशत्रू राज्यपदावर (गादीवर) आला. त्याने आपल्या पित्याच्या विस्तारवादी धोरणाचा अवलंब करून मगधाचे राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारले.
अजातशत्रूने गंगेच्या काठावर पाटलीग्राम छोटा दुर्ग बांधला.तो स्थानिक उत्पादनाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र बनले.
पुढील काळात हेच पाटलीग्राम 'पाटलीपुत्र' या नावाने ओळखले जाऊ लागले. ते मौर्य साम्राज्याची राजधानी बनले.
जनतेने अजातशत्रूला पदच्युत करून, त्याचा मंत्री असलेल्या शिशुनागाची राजा म्हणून निवड केली.
शिशुनाग घराण्याने इसवी सन पूर्व ४३० ते ३६४ या काळात राज्य केले.
त्यानंतर महापद्मनंद यांनी मगधाची गादी बळकावली आणि नंद वंशाची स्थापना केली.(नंद वंशाची स्थापना महापद्मनंद यांनी केली.)
प्रश्न- महापद्मनंद यांची कामगिरी लिहा.
महापद्मनंद ह्याने इसवी सन पूर्व ३६४ मध्ये मगधाची गादी बळकावली व नंद वंशाची स्थापना केली.
त्याने मगध साम्राज्याचा विस्तार केला. त्याचे साम्राज्य दक्षिणेत म्हैसुरपर्यंत विस्तारित झाले.
महापद्मनंद हा एक महान सम्राट होता.
प्रश्न- नंद घराण्याने कोणती लोकोपयोगी कामे केली?
इसवीसन पूर्व ३२१ मध्ये नंद घराण्याचा पाडाव होण्याआधी कर पद्धतीला महत्त्व देऊन राज्याची आर्थिक दृष्ट्या भरभराट केली.
साम्राज्य विस्ताराबरोबर राज्याची आर्थिक भरभराट होऊ लागली.
या पैशांचा विनियोग नंद राज्यकर्त्यांनी कालवे बांधण्यासाठी व जलसिंचनासाठी केला.
त्यामुळे शेतीच्या विकासाला सहाय्य झाले. जलमार्गाच्या विकासामुळे व्यापारवृद्धि झाली.
प्रश्न- मगध साम्राज्याचा उदय झाला. (सकारण स्पष्ट करा)
मगध राज्याचे राज्यकर्ते कर्तबगार असल्याने राज्यात राजकीय स्थैर्य होतं.
मगधाचा विकास होण्यामागे राजकीय स्थैर्य आणि इतर बाबी देखील कारणीभूत होत्या.
गंगा नदीच्या खोऱ्यात सर्व मोक्याच्या ठिकाणी मगधाचे नियंत्रण होते.
‘अंग’ हे राज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यात आला आणि दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार वाढवण्यात मगधाला यश मिळाले.
मगधाला नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभले होते. विशेषत: भातशेतीसाठी उपयुक्त सुपीक जमिन लाभली होती.
साम्राज्यविस्तारामुळे महसुलातदेखील भर पडली.
राजकीय महत्त्वाकांक्षेच्या बरोबरीने धनधान्याची व व्यापाराची सुबत्ता ही मगध राज्यसत्तेच्या विकासासाठी आणि सत्तास्थापनेसाठी पोषक ठरली.
अशाप्रकारे अनुकूल परिस्थितीमुळे मगध साम्राज्याचा उदय झाला.
नंद आणि मौर्य साम्राज्य-
पर्शियन आणि ग्रीकांच्या आक्रमणाचा परिणाम म्हणून भारतात प्रबळ साम्राज्याची आवश्यकता भासू लागली.
इसवीसन पूर्व ६ व्या शतकापासूनच मगध साम्राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती.
या प्रक्रियेतूनच नंद साम्राज्य साकारले. हेच भारतातील पहिले साम्राज्य होय.
परिशिष्ट पर्व,महावंशवाटिका,पुराण ग्रंथ इत्यादींमधून तसेच ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून नंद साम्राज्याविषयी माहिती मिळते.
’क्युरीटस’ ग्रीक इतिहासकार म्हणतो, त्याप्रमाणे नंद साम्राज्याची स्थापना महापद्मनंद यांनी केली.
ग्रीक इतिहासकार महापद्मनंद या राजाचा उल्लेख उग्रसेन म्हणून करतात. उग्रसेन म्हणजेच महापद्मनंद होय.
या राजघराण्यात एकूण ९ राजे होऊन गेले.
महापद्मनंद (उग्रसेन) पांडूक, पांडूगती, भूतपाल, राष्ट्रपाल, गौवीशौनक, दशसिद्ध, कैवर्त आणि धनानंद.
यापैकी महापदमानंद आणि धनानंद हे दोन सम्राट अधिक ख्यातनाम होते. ‘महाबोधीवंश’ या ग्रंथातून या सम्राटांविषयी माहिती येते.नंदांचे साम्राज्य गोदावरी नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेले होते.
‘नवनंदडेरा’ ही त्यांची दक्षिणेतील राजधानी. ‘नवनंदडेरा’ म्हणजेच आजचे नांदेड असावे.
नंदांच्या रूपाने भारतातील पहिले साम्राज्य अस्तित्वात आले आणि भारताच्या राजकीय इतिहासाचा प्रारंभ झाला.
मौर्य साम्राज्य
मौर्य साम्राज्य म्हणजे भारताच्या इतिहासातील पहिले सुसंघटित आणि सुनियंत्रित असे पहिलेच साम्राज्य होय.
या सत्तेकडून राजकीय व्यवस्थेमध्ये एकसुसूत्रता आणली गेली.
चंद्रगुप्त मौर्याने मौर्य घराण्याची स्थापना केली.
धार्मिक ग्रंथ व इतर साहित्य, कोरीव लेख, नाणी,शिल्पे इत्यादी साधनांच्या सहाय्याने या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थितीचा अभ्यास करता येतो.
चंद्रगुप्त मौर्य-
प्रश्न- चंद्रगुप्त मौर्य हा भारताच्या इतिहासातील पहिला चक्रवर्ती सम्राट होय.
चंद्रगुप्त मौर्य याने नंदांचा पराभव केला व मौर्य घराण्याची स्थापना केली.
चंद्रगुप्त मौर्य याला ‘महावंश’ या ग्रंथात ‘तो जंबुद्वीपाचा म्हणजे भारत वर्षाचा सम्राट होता’ असे म्हटले आहे.
इसवीसन पूर्व ३२१ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने मगध साम्राज्याची सूत्रे हाती घेतली.
त्याआधी मगधावर हर्यंक,नाग आणि नंद या घराण्यांनी मगधाचा साम्राज्य विस्तार केला असला तरी, कोणत्याही राज्यकर्त्याला चक्रवर्ती सम्राटाचा दर्जा लाभला नव्हता.
ज्या सार्वभौम राजाचा रथ चारी दिशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतो, तो सार्वभौम राजा चक्रवर्ती सम्राट समजला जातो.
ग्रीक राजा सेल्युकसचा पराभव केल्यानंतर त्याच्या सामर्थ्याला आव्हान देणारा कोणताही राजा भारतात शिल्लक राहिला नाही.
अन्य राजांनी त्याचे मांडलिकत्व पत्करले. त्याची अधिसत्ता संपूर्ण भारतावर होती.
चंद्रगुप्ताच्या सत्तेला नैतिक अधिष्ठान होते. तो प्रजाहितैषी राजा होता.
म्हणून माझ्या मते, चंद्रगुप्त हा भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट होता.
प्रश्न- मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले होते. (सकारण स्पष्ट करा)
चंद्रगुप्त मौर्य पराक्रमी राजा आणि अत्यंत कुशल शासनकर्ता होता.
कौटिल्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्यकारभाराची सुनियंत्रित यंत्रणा उभी केली.
तत्कालीन आर्थिक स्थिती व मौर्य काळाच्या गरजा यातून मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले होते.
चंद्रगुप्त मौर्याची कामगिरी : ( टीप लिहा)
प्रश्न-चंद्रगुप्ताचे ग्रीक राजा सेल्यूकसशी झालेले युद्ध अत्यंत महत्त्वाचे होते . (सकारण स्पष्ट करा)
चंद्रगुप्ताने ग्रीक राजा सेल्यूकस निकेटर याचा युद्धात पराभव केल्याने मौर्य साम्राज्याची सीमा वायव्येकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचली.
या युद्धानंतर झालेल्या समझोत्यामुळे चंद्रगुप्त मौर्याचे ग्रीकांशी संबंध मैत्रीपूर्ण झाले.
सेल्यूकसचा प्रतिनिधी म्हणून मेगॅस्थेनीस चंद्रगुप्ताच्या दरबारात राहिला होता.
त्यामुळे वायव्येकडून परकीय आक्रमणाची शक्यता लोप पावली.
परिणामी मौर्यांचे साम्राज्य वायव्येकडे हिंदुकुश, पूर्वेकडे बंगालचा उपसागर, पश्चिमेकडे गुजरात आणि उत्तरेला हिमालय ते दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत विस्तारले होते.
अशाप्रकारे चंद्रगुप्ताचे ग्रीक राजा सेल्युकसशी झालेले युद्ध आणि त्यातील विचार अत्यंत महत्वाचा होता.
मौर्य सम्राट बिंदुसार-
इसवीसन पूर्व २९८ च्या सुमारास चंद्रगुप्ताचे निधन झाले. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार गादीवर आला.
बिंदुसाराच्या कारकीर्दीत तक्षशीलेच्या प्रजाजनांनी केलेले बंड त्याने आपला पुत्र अशोक यास पाठवून शमवले.
बिंदुसाराच्या कारकीर्दीत चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राहिले.
इसवीसन पूर्व २७३ साली बिंदुसाराचा मृत्यू झाला.
सम्राट अशोक-
प्रश्न- सम्राट अशोक यांच्या कारकीर्दीची माहिती लिहा. ( सविस्तर उत्तर लिहा)
बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट बनला.
सम्राट पदावर येण्याआधी अशोकाने तक्षशीलेच्या प्रजेचे बंड शमवले होते.
इसवीसन पूर्व २६८ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला.
त्यानी ‘देवानं पियो पियदसी’ म्हणजे ‘देवांचा प्रिय प्रियदर्शी’ असा स्वतःचा उल्लेख त्याच्या अनेक शिलालेख आणि स्तंभलेखांतुन केलेला आहे.
सुरूवातीला सम्राट अशोकाचे धोरण आपल्या पूर्वजांप्रमाणे दिग्विजयाचे आणि राज्यविस्ताराचे होते.
अशोकाने कलिंगवर आक्रमण करून ते जिंकून घेतले. अशोकाचा कलिंगवरील विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळे वळण लावणारा ठरला.
या युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाली. अशोकाचा विजय झाला मात्र युद्धातील विनाश आणि मनुष्यहानीमुळे त्याचे हृदय परिवर्तन घडून आले.
त्यांनी विस्तारवादी धोरणाचा त्याग केला. अहिंसाप्रधान, शांतीवादी बौद्ध धर्माकडे त्याचे मन वेधले गेले.
विजयाची जागा (धम्मविजय) धर्मविजयाने घेतली. धर्माचा स्वीकार केला आणि धर्मप्रसारासाठी धर्ममात्रांची नेमणूक केली.
मद्यपान बंदी तसेच नैतिक आचरणासंबंधीचे आदेश त्यांनी शिलालेख आणि स्तंभलेखांच्या माध्यमातून दिले.
नैतिक तत्त्वांचे अधिष्ठान प्राप्त झालेला सदाचारसंपन्न व्यवहार म्हणजेच अशोकाचा धर्म होय.
धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी संघ बनवले आणि ते देशोदेशी रवाना केले. त्यामध्ये त्याचा पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांचाही समावेश होता.
पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद अशोकाने भरवली.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी ८४००० स्तूप बांधले.
‘सारनाथ’ येथील जगप्रसिद्ध स्तंभ त्यांनी बांधला. या स्तंभाच्या स्तंभशीर्षावर चार सिंहाची शिल्पाकृती आहे.
प्रश्न- सम्राट अशोकाचे शिलालेख हे महत्त्वाचे ऐतिहासिक साधन आहे. (तुमचे मत नोंदवा.)
सम्राट अशोकाच्या शिलालेखांमधून त्यांनी उल्लेख केलेल्या पश्चिमेकडील देशातील त्यांच्या समकालीन चार राज्यकर्त्यांची ओळख पटली आहे.
ब्राम्ही लिपीतील त्यांच्या शिलालेखांचे वाचन जेम्स प्रिन्सेस या इतिहासकाराने १८३७ साली केले.
या शिलालेखांच्या वाचनातून मौर्य साम्राज्याची सीमा निश्चित करणे शक्य झाले.
बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते.
अशोकाने बौद्ध धर्म आपल्या राज्याच्या प्रजेवर लादण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. त्यातून त्यांची धर्मसहिष्णूता दिसून येते.
सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मौर्य राजे सक्षम नव्हते. त्यामुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला.
प्रश्न-सम्राट अशोकाच्या साम्राज्य समाविष्ट असलेले प्रदेश कोणते?
वायव्येकडे हिंदुकुश पर्वतरांगांपर्यंत, पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत, पश्चिमेकडे गुजरातपर्यंत, उत्तरेला हिमालय पर्वतापर्यंत, दक्षिणेला कृष्ण नदीपर्यंत चा प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट होता.
प्रश्न- सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तंभालेख कोठे कोठे आहेत?
शिलालेख डोंगरावर कोरलेले आदेशपत्र, तर आदेश लेखनाचा उद्देशाने उभारलेल्या स्तंभांना स्तंभलेख असे म्हणतात.
शिलालेख -वायव्य भारतात- शहाबाद गडी मनसरा व तक्षशिला.
उत्तर भारतात- कोसली, बैराट, काशी.
मध्यप्रदेशात- रुपनाथ.
उडीसात- जौगड.
गुजरात ( सौराष्ट्रात)- गिरनार.
महाराष्ट्रात- सोपारा.
कर्नाटकात- मस्की, कुपगल, सिद्धापूर, ब्रह्मगिरी.
स्तंभालेख - उत्तर भारतात- तोप्रा, मिरत.
नेपाळमध्ये- निगलिवा, कपिलवस्तु.
बिहारमध्ये- रामपूर्वा, लौरिया नंदनगड, पाटलीपुत्र.
मध्य प्रदेशामध्ये- सांची.
कर्नाटकामध्ये- सन्नती.
मौर्य सम्राट बृहद्रथ-
पुराणानुसार, सम्राट अशोकानंतर ६ राजे होऊन गेले, तर वायूपुराणानुसार ८ ते १० राजे होऊन गेले.
बृहद्रथ हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा होता.
इसवीसन पूर्व १८७ साली पुष्यमित्र शुंग या त्याच्या सेनापतीने त्याची हत्या केली आणि मौर्य साम्राज्य संपुष्टात आले. त्यानंतर पुष्यमित्र सत्तेवर आला.
राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाजजीवन-
राज्यव्यवस्था-
मौर्यकालीन राज्यव्यवस्थेचे स्वरूप कौटिल्याचे अर्थशास्त्र, मेगॅस्थेनीसचे इंडिका या दोन ग्रंथांमधून आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांवरून स्पष्ट होते.
प्रश्न- मौर्य साम्राज्याचे पुढील मुद्द्यांच्या आधारे विवरण करा. (सविस्तर उत्तर लिहा)
अ. राज्यव्यवस्था ब. समाजव्यवस्था क.आर्थिक जीवन ड. साहित्य.
अ.राज्यव्यवस्था-
मौर्य राज्यकर्त्यांनी त्यांच्या खंडप्राय साम्राज्याच्या प्रशासनासाठी सुनियंत्रित प्रशासन यंत्रणा स्थापन केली होती.
साम्राज्याच्या विस्तारलेल्या सीमा लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरणही करण्यात आले होते.
साम्राज्याच्या प्रशासनात राजाला सल्ला देण्यासाठी बुद्धिमान, अनुभवी, चारित्र्यवान आणि निस्वार्थी मंत्र्यांची परिषद स्थापन केलेली होती.
दैनंदिन राज्यकारभारासाठी त्यातील काही मंत्र्यांची समिती असे, त्या समितीस ‘मंत्रणा’ असे नाव होते.
प्रशासनाची विविध खाती निर्माण करून त्यावर अनुभवी व तज्ञ अधिकारी नेमून स्थिर प्रशासन व्यवस्था निर्माण केली होती.
प्रशासनाच्या १८ खात्यात विभागणी करून त्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
मौर्य साम्राज्यातील अधिकारांच्या उतरंडीची रचना ‘सम्राट’ या पदापासून सुरू होऊन शेवटचा अधिकारी गाव पातळीवरील ‘ग्रामणी’ होता.
स्थानिक पातळीवरच्या राज्यकारभारात स्वायत्तता देण्यात आली होती. मुलकी आणि लष्करी क्षेत्रे एकमेकांपासून स्वतंत्र होते. न्यायव्यवस्था स्वतंत्र होती.
राज्यातील व्यापारावर शासनकर्त्यांचे नियंत्रण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रजेच्या भौतिक आणि नैतिक प्रगतीसाठी शासन करते वचनबद्ध होते.
समाजव्यवस्था -
मौर्य काळात भारतात चातुर्वर्ण पद्धत दृढ झाली होती.
व्यवसायावर आधारलेल्या भारतीय समाजाच्या सात वर्गांचे वर्णन मेगॅस्थेनीस करतो. त्यामध्ये पुरोहित शेतकरी, धनगर व शिकारी, व्यापारी व मजूर, सैनिक, हेर आणि सरकारी अधिकारी हे सात वर्ग होते.
मौर्यकालीन समाजाची नीतिमत्ता उच्च दर्जाची होती. लोकजीवन संपन्न व सुखी होते.
नट, नर्तक, गायक, वादक मनोरंजन करणारा वर्ग होता. रथांच्या, घोड्यांच्या शर्यती, मल्लयुद्ध तसेच नृत्य-गायन स्पर्धा हे करमणुकीचे लोकप्रिय प्रकार होते. द्यूत खेळणे प्रचलित होते, पण त्यावर सरकारी नियंत्रण होते.
मौर्यकाळात तक्षशिला, काशी, अयोध्या ही उच्च विद्या व कला शिक्षणाची केंद्रे होती.
मात्र या काळात स्त्रियांच्या शिक्षणाची उपेक्षा सुरूच राहिली. त्यांचे समाजात दुय्यम स्थान असले तरीदेखील, स्त्रियांचा स्त्री-धनावर पूर्ण अधिकार होता.
अनाथ व दिव्यांग स्त्रियांची काळजी शासन घेत असे. अनेक स्त्रिया गुप्तचर यंत्रणेत काम करत.
आर्थिक जीवन / व्यापार-
आर्थिक जीवन सुख, शांती व समृद्धीचे होते. सुव्यवस्थित कर प्रणालीमुळे राज्याच्या महसुलात वाढ झाली होती.
शेतजमीन व शेती उत्पादन यापासून मिळणारे उत्पन्न राज्य व्यवस्थेचा पाया होते.
या काळात व्यापार व उद्योगांनाही चालना मिळाली. कापड निर्मिती हा सर्वात महत्त्वाचा उद्योग होता. याशिवाय धातुकाम, लाकूडकाम, हस्तीदंत त्यावरील कलाकुसर, लोखंडी अवजार, मातीची रंगवलेली भांडी असे अन्य उद्योग होते.
भूमार्ग व जलमार्गाने देशांतर्गत व्यापार चाले.अनेक राजमार्ग आणि व्यापारी मार्ग या काळात निर्माण केले गेले.
किनारपट्टीवरील अनेक बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती.
भारताच्या किनारपट्टीवरील भरूच, रोरूक ( रोडी), सोपारा व ताम्रलिप्ति बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती.
ग्रीस, रोम,इजिप्त,सीरिया, बॅक्टेरिया, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये भारतातून सुती व रेशमी कापड,क्षौम (लिनन), जरीची वस्त्रे, मसाले, हिरे, हस्तिदंत, सुगंधी द्रव्य,इत्यादीं निर्यात केले जात.
काच सामान, कापड रंगवण्याचे विविध रंग इत्यादींची आयात केली जाई. मालाच्या उत्पादनावर तसेच त्याच्या आयात-निर्यातीवर सरकार कर वसूल करत असे.
- साहित्य -
साहित्यामधून लोकांच्या विचारसरणीची आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थितीची माहिती मिळते.
मौर्यकाळात संस्कृत भाषेबरोबरच पाली,अर्धमागधी या भाषांमध्ये ग्रंथनिर्मिती झाली.
जैन व बौद्ध धर्म प्रसारासाठी प्राकृत भाषेत साहित्यनिर्मिती झाली. यामध्ये प्रामुख्याने पाली, अर्धमागधी, मागधी, शूरसेनी, महाराष्ट्री इत्यादी प्राकृत भाषांचा वापर केला गेला.
पाणिनीचा ‘अष्टाध्यायी’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ मौर्यकाळात रचला गेला.
संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार भास याने ‘स्वप्नवासवदत्त्तम’ यासह १३ नाटके लिहिली.
या काळातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ होय.
कौटिल्याने अर्थशास्त्र हा ग्रंथ १५ विभागात लिहिला.
कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात एकूण १८० प्रकरणे आहेत.
अर्थशास्त्रात राजापासून गणिकांपर्यंत आणि राजनीतिपासून युद्धनीतीपर्यंत अनेक विषयांची चर्चा केलेली आढळते.
मौर्यकाळात संस्कृतबरोबर प्राकृत भाषेत विपुल ग्रंथसंपदा निर्माण झाली.
शिलालेख व स्तंभालेख ब्राम्ही लिपीत कोरले गेले. बौद्ध साहित्यातील ‘तिपिटक’ या ग्रंथाचे संपादन या काळात झाले.
जैन साहित्यातील दशवैकालीक, उपासकदशांग, आचाररंगसूत्र, भगवतीसूत्र या ग्रंथांची निर्मिती मौर्य कालखंडात झाली.
हा काळ जैन साहित्याच्या दृष्टीने समृद्ध होता.
कला आणि स्थापत्य -
मौर्य राज्याच्या स्थापनेनंतर देशात सुख,शांती,समृद्धी आणि सुव्यवस्था नांदू लागली होती.
मौर्यकालीन कला म्हणजे प्राचीन ऐतिहासिक काळातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा प्रारंभ होय.
- मौर्यकालीन शिल्पकला आणि स्थापत्य. (टिप लिहा)
प्राचीन भारतातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा प्रारंभ मौर्यकाळात झाला.
दगड घडवणे आणि कोरणे यामध्ये मौर्यकालीन कारागिरांनी लक्षणीय नैपुण्य संपादन केले होते.
दगड घडवल्यानंतर त्याला आरसी गुळगुळीतपणा आणण्याचे ‘घोटाई’ हे तंत्र त्यांनी आत्मसात केले होते.
या काळातील यक्ष व यक्षिणी यांच्या मूर्ती सापडल्या आहेत.यक्षिणीच्या मूर्ती सुंदर आणि सुबक आहे.
दीदारगंज येथील प्रसिद्ध चौरीधारिणी मूर्तीचा समावेश त्यामध्ये केला जातो.
याकाळात घडवलेल्या पारखम येथील यक्षमूर्ती व बेस्टनगर आणि पाटणा येथे मिळालेल्या स्त्री प्रतिमा मथुरा वस्तूसंग्रहालयात प्रदर्शित केलेल्या आहेत.
सम्राट अशोकाचे स्तंभ आणि त्यावर शिल्पाकृती मौर्य काळातील उत्कृष्ट शिल्पाचे नमुने आहेत.
रामपुर्वा आणि लौरिया नंदनगड येथील स्तंभशीर्षावर सिंहाच्या शिल्पाकृती आहेत.
सांकिशा येथील स्तंभशीर्षावर हत्तीची शिल्पाकृती आहे.
सारनाथ येथील स्तंभशीर्षावर चार सिहांच्या शिल्पाकृती आहेत.
चार सिंहांचे हे शिल्प भारताचे ‘राष्ट्रीय बोधचिन्ह’ आहे.
मौर्यकाळाला बहुविध पैलु आहेत. त्यामुळे या काळाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर प्रशासनयंत्रणा कमकुवत होत गेली.त्यामुळे साम्राज्याचे तुकडे पडू लागले.
मौर्योत्तरकाळात विघटित झालेल्या साम्राज्याचे पुन्हा संघटन करण्याचे काम शुंग आणि सातवाहन सत्तेखाली झाले.
वैदिक धर्म, वर्णाश्रमव्यवस्था, व वैदिक धर्मपरंपरेनुसार असलेली जीवन प्रणाली या सर्वांना पुन्हा महत्त्व आले.
-------------------समाप्त------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा