'कृतज्ञता' हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. सर्वम् खल्विदंम् ब्रम्ह हा भाव असलेल्या भारतीयांनी पशुपक्ष्यांचीही कृतज्ञभावाने पूजा करण्याची प्रथा निर्माण केली.
दूध देणाऱ्या गाईसाठी 'वसुबारस', शेतीचे काम करणाऱ्या बैलांसाठी 'पोळा', मधुर संगीत गाणाऱ्या कोकीळे साठी 'कोकिळाव्रत', तर शेतीचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागासाठी 'नागपंचमी' या सणांचा यात अंतर्भाव होतो.
नागपंचमीला राखी पंचमी (श्रीशंकराला राकेश्वर म्हणतात.), अरंधन व भैय्या पंचमी असे म्हणतात.
नागाचे आकस्मित दर्शन झाल्यावर 'श्रीशिवशंकराने साक्षात्कार दिला' अशी श्रद्धा आहे.
श्रीकृष्ण गीतेत म्हणाले-
सर्पाणाम् अस्मि वासुकि:||२८|| व अनंतस् चास्मि नागानाम्||२९|| (गी.अ.१०)
श्रीविष्णूच्या तमोगुणातून नागाची निर्मिती झाली.
नागाचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत.
भारतीयांचे आराध्य दैवत भगवान श्रीविष्णूला क्षीरसागरात बसण्यासाठी स्वतःच्या अंगाचे आसन करणारा 'शेषशायी नाग', विष प्राशन केल्यावर अंगाचा दाह नाहीसा व्हावा, म्हणून आपल्या थंड शरीराचे वेटोळे घालून श्रीशंकरास आनंद देणारा नाग, देवासुरांच्या समुद्रमंथनामध्ये त्यांना मदत करणारी 'वासुकी', भगवान श्रीरामचंद्राला सोबत करणारा 'लक्ष्मण' व श्रीकृष्णाला रागावून प्रेम देणारा 'बलराम' हे शेषावतार होते.
नागाची प्रार्थना करणारा भारतीय वंदन करून म्हणतो, अनंतम् वासुकीम् शेषम् पद् नाभम् कमलम च कंबलम् शंखपालम् धृतराष्ट्रम् तक्षकम् कालियम् तथा||१||येतानी नवनामानि नागानाम् च महात्मा नाम् || सायंकाले पठेन् नित्यम् प्राप्त: काले विशेषतः || तस्य विषय नास्ति सर्वत्र विजयी भवेत्||२||
अनंत, वासुकी, शेष, पद्द्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक व कालिया या नऊ नावांनी प्रसिद्ध असलेला नाग तसा निरुपद्रवी सरपटणारा प्राणी आहे.
सर्पाचे वर्णन वेदापासून ते पुराणापर्यंत सर्व ग्रंथात आहे.
महाभारतकाळात 'नाग' नावाची जात होती.
त्यांचा आर्य लोकांशी संघर्ष होत असे, अशी कथा आहे.
इंद्रप्रस्थनगरी स्थापन करण्यासाठी कृष्णार्जुनाच्या विनंतीवरून अग्नीने खांडववन जाळले.
त्यात नागांच्या अनेक जाती जळून गेल्या. त्यातून 'तक्षक' नावाचा नाग वाचला.
राजा परीक्षितीने ध्यानमग्न असलेल्या ऋषींच्या गळ्यात मृत सर्प टाकल्यामुळे चिडलेल्या त्यांच्या 'शृंग' नावाच्या मुलाने 'हे परीक्षिते! तुला सात दिवसात तक्षक दंश करील', असा शाप दिल्यावर तक्षकाने ऋषिआज्ञा म्हणून परीक्षितीला दंश केला होता.
त्यामुळे परीक्षितिचा मुलगा जनमेजय यांनी 'सर्पसत्र' नावाचा यज्ञ करून त्यांचा नाश करण्यास प्रारंभ केला.
आर्य व नाग यांचा वाद अधिक चिघळू नये, म्हणून नागपुत्र 'आस्तिक' त्यांनी या दोन्ही जातींचे मनोमिलन केले.
तसेच गोकुळातील यमुनेच्या डोहात राहणाऱ्या कालियाच्या विषामुळे अनेक गाई, गोप मेल्याने श्रीगोपालकृष्णाने कालियाला शिक्षा करून यमुनेतून हाकलून दिले.
तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.
वरील घटनांची स्मृती म्हणून नागपंचमीचा सण संपन्न केला जातो.
नागाच्या नावामध्ये शेष व अनंत ही दोन नावे अर्थपूर्ण आहेत.
माणसाच्या जीवनाचा 'शेष, अनंत' असावा.
साप ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यांचे संरक्षण करणे ही आपली गरज आहे.
साप शेतकर्यांचा मित्र आहे.
शेतीचे नुकसान करणारे किमान २५० उंदीर धामण साप वर्षात खातो.
'ऑलिव्ह कील बॅक' या पाणसापाची पिल्ले डासांच्या अळ्यांवर जगतात.
साप हा भित्रा व निरुपद्रवी प्राणी असून साप मधुर संगीतामुळे डुलतो हे चुकीचे आहे. कारण त्याला कान नसल्याने ऐकावयास येत नाही.
गारुड्याच्या पुंगीच्या हालचालीबरोबर तो डोलत असतो. साप डूख धरतो ही अंधश्रद्धा आहे. कारण सापाला स्मरणशक्ती नाही.
साप दूध पितो हेही चुकीचे आहे. कारण सापाची जीभ बारीक व फाटे फुटलेली असते त्यामुळे त्याला दूध शोषून घेता येत नाही.
साप चावल्यावर मांत्रिकाच्या उपचाराने विष उतरते, ही अंधश्रद्धा आहे.
नाग, नागीण, घोणस, फुरसे, मण्यार अशा ५० विषारी जाती असून डुलक्या घोणस, मंडोळ, अजगर, तसकर, धामण, दिवळ, नानेटी, पाण्याळी, सापटोळी, गवत्या साप इत्यादी साप बिनविषारी आहेत.
साप हा मांसाहारी प्राणी आहे. अर्थात सापाला मोर, बँजर, काही जातीचे कासव, कोल्हे, डुक्कर, गरुड, ससाणे, घुबड, घार व मुंगूस हे शत्रू आहेत.
बिहारमध्ये नागपंचमीला काही महिला भिक्षा मागून तिची मिठाई घेऊन सामान्य नागरिकांना वाटतात, तर उदयपूरमधील लोक विषारी प्राण्यांचा उपद्रव होऊ नये, म्हणून एक वनस्पती आणून ठेवतात.
शेषाची बहिण व जरत्कारु ऋषीची पत्नी 'मनसा' या नागदेवतेची बंगाल प्रांतात भाद्रपद व अश्विन पूनवेस नागपूजा करतात.
अनेक अलंकारात नागाच्या आकाराचा उपयोग करतात.
नागपंचमीला गारुड्याच्या नागाच्या पूजेऐवजी भिंतीवर वा कागदावर नाग नागिणीचे चित्र काढून किंवा शाडू, फायबर ग्लास,शेण, माती वा प्लास्टर ऑफ पॅरिस यांची नागाची मूर्ती करून त्याची पूजा करावी.
या दिवशी सासुरवाशीण मुली आपल्या माहेरी येतात व चल ग सखे वारुळाला| हे गाणे म्हणत फेर धरतात.
फुगड्या, झिम्मा खेळाबरोबर झाडाला झोका बांधून खेळतात.
'बत्तीसशिराळे' (जि. सांगली, महाराष्ट्र) या गावी नागदेवतेची फार मोठी यात्रा भरते.
नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवत नाहीत, म्हणून पुरणाचे उकडलेले 'दिंड' व कोथिंबीर घातलेल्या डाळीच्या पिठाचे तिखट वडे व गवारची भाजी करतात.
या दिवशी भाजी चिरत नाहीत. विशेषत: सापासारखी दिसणारी पडवळाची भाजी खात नाहीत.
वारूळाकडे जाऊन वा घरात काढलेल्या नागमूर्तीसमोर लाह्या, दही, दूध, तूप, मोदक, शिरा यांचा नैवेद्य दाखवून दुर्वा,कुंथा, आघाडा इत्यादी पत्री वाहतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा